पुणे: शहरात कारवाईपेक्षा वाहतूक नियमनाला महत्त्व देण्याची गरज आहे. अनेकदा वाहतूक पोलिस रस्त्याच्या बाजूला कारवाई करताना दिसून येतात. त्यामुळे पुढील काही दिवस, शक्य झाले तर दिवाळीपर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई सोडून वाहतुकीचे नियमन करावे, असे मत वाहतूक प्रश्नावर सल्लागार समितीने व्यक्त केले आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या आठवड्यातच याबबात एक आदेश काढला असून, त्यामध्ये त्यांनी पुढील पंधरा दिवस शहरात वाहतूक पोलिस कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करणार नाहीत. त्यांचे पूर्ण लक्ष वाहतूक नियमनावर असणार आहे. वाहतूक पोलिसांकडील मशिन, टेम्पो आणि क्रेन वाहतूक विभागात जमा करण्यात आले आहेत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे या वेळी कारवाई सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरातील वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासोबतच खासगी वाहनांची संख्या कमी करणे, पादचाऱ्यांसाठी सुविधा निर्माण करणे आणि वाहतूक पोलिसांचे प्रभावी नियमन आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
सार्वजनिक वाहतूक सुधारायची की खासगी वाहनांना महत्त्व द्यायचे, याचा विचार करण्याची गरज आहे. केवळ ११ टक्के नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, हे प्रमाण अत्यंत कमी आहे. शहरात दररोज सुमारे ३ हजार ६०० वाहनांची भर पडत असून, ही चिंताजनक बाब असल्याचे मत माजी खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
शहरात एफएसआयची खैरात वाढत चालली आहे. ती थांबवावी लागणार आहे; अन्यथा वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. वाहतूक कोंडीमध्ये महापालिकेचा मोठा सहभाग आहे. वाहतूक समस्येबाबत बोलताना पादचाऱ्यांचा विचारच केला जात नाही. अनेक रस्त्यांवर आणि चौकांमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नाहीत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
माजी महापौर अंकुश काकडे म्हणाले की, पीएमपीकडे बससंख्या कमी आहे. महापालिकेच्या वतीने वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या १५० वॉर्डनवर कोणाचेही नियंत्रण नाही. अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांचा विचार केला असता २०१७ ते २०२६ या कालावधीत त्यांची संख्या १०० पटीने वाढली आहे. २०१७ नेमक्या किती टपऱ्या व हातगाड्या होत्या आणि २०२६ मध्ये किती आहेत, याची आकडेवारी जाहीर करायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, वाहतूक पोलिसांनी पुढील १५ दिवस केवळ वाहतुकीचे नियमन करावे, कारवाई करू नये, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. कारवाईची मशिन दिवाळीपर्यंत बंद ठेवायला हवी तसेच वाहतूक पोलिस प्रत्येक चौकात उभे असायला हवेत. आज शहरभर वाहतूक कोंडी झाली नसती. मेट्रो स्थानकांवर पार्किंगची व्यवस्था नाही. पीएमपी बससंख्याही पुरेशी नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; पुढील पन्नास वर्षांचा विचार करणे गरजेचे: मुरलीधर मोहोळ
पुण्यातील वाहतूक कोंडी, समस्या हा चर्चेचा विषय न राहता पुढील पन्नास वर्षांत शहराचा होणारा विस्तार लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय हवाई नागरी वाहतूक विभागाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. वाहतूक समस्या विचारात घेऊन रखडलेली वाहतूक विषय कामे, उपाययोजना तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. पुण्याचे नाव जगभरात अभिमानाने घेतले जाते. मात्र, या वैभवाला सध्या वाहतूक कोंडीचे गालगोट लागले आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीरपणे घेण्याची गरज असल्याचे देखील मोहोळ यांनी सष्ट केले.
पुणे शहर पोलिसांकडून वाहतूक सल्लागार समितीची बैठक मंगळवारी (दि. १८) पोलिस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली. या वेळी मोहोळ बोलत होते. या प्रसंगी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसाेडे, तेजस्वी सातपुते, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह महापालिका, मेट्रोतील अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. माजी महापौर अकुंश काकडे, ॲड. वंदना चव्हाण, मोहन जोशी, गजानन थरकुडे, राजेंद्र वागसकर, 'परिसर' संस्थेचे रणजित गाडगीळ, दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, तसेच विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
पुणे शहराचा विस्तार चहूबाजूंनी होत आहे. लोकसंख्या ६० ते ७० लाखांच्या घरात पोहोचली आहे. भौगोलिक विस्तार, वाहनांची संख्या विचारात घेतल्यास रस्ते अपुरे पडत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. वाढती वाहने, वाहतूक कोंडीमुळे नागरी सुविधांवर ताण पडत आहे. पुणे शहराचा नावलौकिक जागतिक स्तरावर आहे. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्याला धक्का पोहोचला आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिका, पोलिस, पीएमपी, मेट्रो, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. दीर्घकालीन उपाययोजना केल्यास निश्चित बदल घडेल, असे मोहोळ यांनी नमूद केले.
केवळ चर्चा करून वाहतूक विषयक समस्या सुटणार नाहीत. या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मागील काळातील कामांना गती देताना शहराचा विस्तार विचारात घेऊन नियोजन केले पाहिजे. योग्य निर्णय घेतले नाही. तर पुढील पिढी माफ करणार नाही, याकडे मोहोळ यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी पोलिस चौकीस्तरावर समिती स्थापन केल्याचे आमितेश कुमार यांनी सांगितले. या समितीत परिसरातील नागरिकांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागातील वाहतूक समस्या अगदी बारकाईने समजण्यास मदत होणार आहे.