पुणे: राज्यातील शाळांच्या परीक्षा 22 एप्रिलला संपल्या असून, शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच, 2 मे ते 14 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना सुटी मिळणार आहे. परंतु, शिक्षकांच्या सुटीवर मात्र संक्रांत येणार असून, त्यांना आता जनगणनेचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना यंदा उन्हाळी सुट्या मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
2011 नंतर आता जनगणना होणार असून, पहिल्यांदा नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. जनगणनेचा आदेश सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. अंतिम सत्राच्या परीक्षा संपताच 2027 वर्षातील जनगणनेचा पहिला टप्पा 27 एप्रिलपासून सुरू होत आहे.
शिक्षकांचे प्रशिक्षण होऊन 16 मेपासून त्यांना गावागावांतील घरांची गणना करून त्याच्या याद्या तयार कराव्या लागणार आहेत. 14 जूनपर्यंत जनगणनेअंतर्गत घरयादी व घरांची गणना करायची आहे. त्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे कोणालाही सुटीच्या काळात मुख्यालय व शहर, गाव सोडता येणार नाही.
ही आहे शिक्षकांच्या कामांची लांबलचक यादी
यासंदर्भात शिक्षकांनी एक कामाची यादीच दिली आहे. यामध्ये एसएससी बोर्ड परीक्षा, बोर्डाचे पेपर चेकिंग, मॉडरेशन, जनगणना ट्रेनिंग, शाळेच्या विद्यार्थ्यांचे पेपर चेकिंग, पॅट परीक्षा, त्याचवेळी पटपडताळणी, पॅटचे पेपर चेकिंग, चॅटबॉटवर मार्कांची नोंद करणे, गुणयाद्या करणे, एप्रिलअखेर विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल ऑनलाइन व ऑफलाइन तयार करणे, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीचे जादा तास घेणे, मे महिन्यातील छंद वर्गाचे नियोजन करणे, छंद वर्ग घेणे, नवीन वर्षाच्या विद्यार्थी प्रवेशासाठी अधिक वेळ देणे, बदलत्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणास उपस्थित राहणे, टीईटी परीक्षा जून महिन्यात असल्याने त्या परीक्षेचा अभ्यास मे महिन्यात स्वतः करणे,
‘निपुण भारत योजने’त विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, ‘परख सर्वेक्षण’नुसार कमी प्रगती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूरक अध्यापन करणे, भाषा, गणित, विज्ञान या विषयातील शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करणे, वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे, एसक्यूएएएफ ॲपद्वारे शाळा गुणवत्ता मूल्यमापन पूर्ण करणे, अतिरिक्त शिक्षक, शिक्षक बदली, दहावी बोर्डाचा निकाल देताना शाळा सोडल्याचा दाखला तयार ठेवणे, नंतर अकरावी प्रवेशासाठी अर्जातील भाग-1 विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेणे, शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा रिपोर्ट तयार करणे, नवीन वर्षाचे नियोजन, पालकांना मार्गदर्शन इत्यादी सर्व कामे एकाच वेळी शिक्षकांना मेअखेरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत.
उन्हाळी सुटीत शाळेच्या नियमित कामांबरोबरच जनगणनेची कामे पाहिली, तर शिक्षकांवर हा कामाचा बोजा नसून तो कामाचा डोंगर असणार आहे. ही सर्व कामे शिक्षक समायोजन यांसारख्या मानसिक स्थिती बदलणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागणार असून, मे महिन्यात घरांची यादी व घरगणना तसेच 34 प्रश्न असलेली प्रश्नावली नागरिकांना जनगणनेसाठी विचारून ती संयमाने भरण्याचे काम करावे लागणारे आहे.एक शिक्षक