पुणे – पुढारी वृत्तसेवा – शिवस्वराज्य दिन चिरायू होवो…शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा गगनभेदी जयघोष झाला. रणशिंगाच्या ललकारीत, मर्दानी खेळाच्या चित्त थरारात आणि ढोल-ताशांच्या गजरात एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील परिसर हजारो शिवभक्तांनी दणाणून गेला. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
शिवजयंती महोत्सव समिती आयोजित ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भगव्या स्वराज्य ध्वजासह ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्य गुढी शिवाजीनगरमधील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर उभारण्यात आली. सोहळ्याचे हे सलग १२ वे वर्षे होते.
कार्यक्रमात शिवकालीन सरदारांचे वंशज, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, समितीचे सचिव सचिन पायगुडे, उपाध्यक्ष रवींद्र कंक, सदस्य शंकर कडू, निलेश जेधे, मंगेश, सागर पवार, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, मयुरेश दळवी आणि सर्व स्वराज्य घराणे, स्वराज्य बांधव, महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी रिंकल गायकवाड, ललिता कंक, अश्विनी कडू, प्रिया जेधे, प्रिया पासलकर, शोभा भोई, दिपाली गव्हाणे, महिलांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पूजन करुन ५१ फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
सोहळ्याची सुरुवात शिवरायांच्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करुन झाली. त्यानंतर शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. समितीने खास बनवलेल्या ३५१ सुवर्णहोनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला.
अधिक वाचा-
यावेळी गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन ६ जून हा वैश्विक साजरा व्हावा या प्रेरणेतून ६ जून, २०१३ ला शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सर्वप्रथम दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, राजगड यासह असंख्य ठिकाणी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
सन २०२१ सालापासून अमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास खात्याने तसेच उच्च व तंत्र खात्याने शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३ हजार गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये हा दिवस सार्वजनिक शिवस्वराज्य दिन स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यास सुरुवात केली.
अधिक वाचा-
सोहळ्याच्या तपपूर्ती वर्षात आता प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात, महाविद्यालयात, राज्यात तसेच देशविदेशात सार्वजनिक शिवस्वराज्य दिन स्वराज्यगुढी उभारून साजरा केला जात आहे. ३५१ व्या शिवराज्याभिषेक वर्षात हा दिवस भारत सरकारने राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करुन शिवरायांना देशस्तरीय मानवंदना द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्य गुढी उभारली जाते. त्याचबरोबरीने यावर्षी शिवकालीन सरदारांच्या वंशजांकडून शिवनेरी, राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, संग्रामदुर्ग यासह ३५१ गडांवर तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ, लक्ष्मीबाई दत्त मंदिर यासह ३६० गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन साजरा केला.
अधिक वाचा-