पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आरक्षित प्रवर्गातील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाने 1 किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक किलोमीटरच्या आतील शाळांची निवड करून अर्ज भरलेल्या पालकांना प्रवेशासाठी एक किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर, तसेच तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत.