पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या बहुप्रतीक्षित रिंगरोड प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, आत्तापर्यंत ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यासोबतच प्रमुख राष्ट्रीय महामार्गांदरम्यान थेट संपर्कही निर्माण होणार आहे.
एमएसआरडीसीने प्रकल्पाच्या कामावर नियमित देखरेख ठेवली असून, उर्वरित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम टप्प्याचे काम २०२७ पर्यंत, तर पूर्व टप्प्याचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासह शहरातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
पुणे रिंगरोड हा राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असून, त्याच्या कामात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. रिंगरोडच्या प्रत्येक टप्प्यात दर्जेदार बांधकामाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कामाला अधिक गती देण्यात आली आहे. विविध पॅकेजमध्ये यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ वाढवून नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी