पुणे: श्री विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदी, देहूतून निघालेला वैष्णवांचा भक्तिसोहळा आज म्हणजेच गुरुवारी (दि. ९) पुण्यामध्ये येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. विठ्ठल मंदिरांमध्येही तयारी पूर्ण झाली असून, श्री विठ्ठलनामाचा गजर, भगव्या पताका, आकर्षक विद्युतरोषणाई, स्वागत कमानी आणि उत्सव मंडपांमुळे शहरासह उपनगर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.
राज्यभरातील वारकरी पुण्यात येण्यास सुरुवात झाली. गुरुवारी (दि. ९) दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन होणार असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) आणि श्री निवडुंगा विठोबा मंदिर (नाना पेठ) परिसर चैतन्याने फुलला आहे. तयारीही पूर्ण झाली आहे. गुरुवारी (दि. ९) सायंकाळी पालख्यांचे आगमन झाल्यानंतर मंदिर विश्वस्तांकडून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. १०) दोन्ही पालख्यांचा पुण्यात मुक्काम असणार आहे आणि शनिवारी (दि. ११) दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील.
पालखी विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरण
भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असतो. येथेही तयारी पूर्ण झाली असून, भव्य उत्सव मंडप उभारण्यात आला आहे. तर वारकऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मंदिराचे गोरखनाथ भिकुले म्हणाले, पालखी सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. पालखीचे स्वागत पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिभावाने केले जाणार आहे.
श्री निवडुंगा विठोबा मंदिर सज्ज
नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळले आहे तर फुलांची सजावटही करण्यात आली आहे.
मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, सायंकाळी पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर पादुका पूजन, दही भाताचा नैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर पालखीचे मंदिराच्या आत प्रवेश होईल, आरती झाल्यावर संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दिंडीतील वारकर्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.