पुणे: शहरातील पावसाळी नियोजन आणि पाणी साठणाऱ्या ठिकाणांवरील उपाययोजनांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असतानाही पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या प्रभावीपणे कमी का झाली नाही, असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
शहरात मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्यावर राज्यमंत्री मोहोळ यांनी महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेत आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळी कामांचा आढावा घेतला.
बैठकीस महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या हद्दीत १२० पाणी साचणारी ठिकाणे असून, त्यांपैकी ८५ ठिकाणी सुधारणा केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी बैठकीत केला. मात्र, त्या ८५ ठिकाणांपैकी नेमक्या किती ठिकाणी यंदाच्या पावसात पाणी साचले नाही, याची कोणतीही ठोस माहिती अधिकाऱ्यांकडे नव्हती.
यावर नाराजी व्यक्त करत पुढील बैठकीत सर्व ८५ ठिकाणांचे पावसाच्या काळातील छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना आम्हालाच उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे केवळ कागदोपत्री कामे दाखवून चालणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
भाजपच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह
पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. आता पावसाळी कामांवर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली असली तरी सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक नाही का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबरच महापालिकेतील कारभाऱ्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.