पुणे: पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचे कामही गतीने पूर्ण केले जाणार आहे. या कामाला देखील लवकरच सुरुवात केली जाईल. देशात, राज्यात आणि स्थानिक महापालिकेवरही आमचीच सत्ता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठीचे कोणतेही प्रकल्प थांबणार नाहीत, लवकरच त्यांना सुरुवात केली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
पुणेकरांच्या दळणवळणात क्रांती घडवून आणणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (दि. 17) पुणे येथे केली. पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी या नव्या रेल्वेला रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. त्यानंतर हडपसर येथून दाणापूरसाठीच्या अमृत भारत रेल्वेलाही रेल्वेमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुणे रेल्वेस्थानकावर आयोजित सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे ऑनलाइन माध्यमातून, तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रत्यक्ष उपस्थित होते.
आळंदीत मेगा टर्मिनल
पुण्याची 70 लाखांची लोकसंख्या लक्षात घेता शहराची रेल्वेक्षमता वाढवण्यासाठी मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले. यासाठी आळंदी येथे देशातील एक मोठे मेगा टर्मिनल उभारण्यात येणार असून, तिथे अनेक प्लॅटफॉर्म आणि 17 स्टेबलिंग लाइन्स असतील. येथेच गाड्यांची देखभाल व दुरुस्ती होणार असल्याने पुणे स्टेशनवरील ताण कमी होईल व पुणे रेल्वे स्थानकावरून आणखी 20 अतिरिक्त गाड्या सोडणे शक्य होणार आहे. तसेच पुणे स्टेशन पूर्णपणे डिजिटल करून तिथे 3 प्रवेशद्वारांसह 12 प्लॅटफॉर्म बनवले जातील. त्यामुळे स्थानक परिसरातील कोंडी फुटेल, असेही ते म्हणाले.
पुणे-दिल्ली वंदे भारत सुरू करण्यास रेल्वेमंत्र्यांचा होकार
पुणे ते शिर्डी थेट रेल्वेमुळे सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक कॉरिडॉर तयार झाला आहे. यामुळे साईभक्तांचा प्रवास सुकर होईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच, पुणेकरांच्या मागणीनुसार पुणे-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास रेल्वेमंत्र्यांनी होकार दर्शविला आहे, असे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे नव्या मार्गानेच धावणार
पुणे, चाकण, अहिल्यानगर शिर्डीमार्गे नाशिकला जाणारी पुणे-नाशिक रेल्वे लवकरच धावणार असून, तिचे काम वेगात सुरू आहे. पूर्वीचा पुणे-नाशिक सेमी हायस्पीडचा प्लॅन तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आला आहे. नव्या मार्गाच्या डीपीआरनुसारच पुणे-नाशिक रेल्वे धावणार असल्याचे मंत्री वैष्णव यांनी या वेळी सांगितले.
पुणे-मुंबई बुलेट ट्रेन अवघ्या ४८ मिनिटांत पोहचणार
पुणे-मुंबई बुलेट ट्रेन या कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होणार असून, यामुळे अवघ्या 48 मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास पूर्ण होईल. ही ट्रेन दर तासाला धावणार असून, भविष्यात तिची फ्रिक्वेन्सी आणखी वाढवली जाईल. याशिवाय पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन या मार्गामुळे हैदराबादचा प्रवास अवघ्या 2 तास 8 मिनिटांत होणार आहे.
महाराष्ट्राला २४ हजार कोटींचे बजेट
केंद्राकडून महाराष्ट्राच्या रेल्वेविकासासाठी 24 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तो आत्तापर्यंतचा सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे विकासाची कामे आणखी वेगाने होणार आहेत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात मलेशिया या देशापेक्षाही जास्त रेल्वेट्रॅक तयार करण्यात आलेत. सध्या राज्यात 24 वंदे भारत ट्रेन धावत असून, लातूरच्या कारखान्यात वंदे भारत स्लीपर तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.