पुणे : पुढारी वृत्तसेवा : एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुनील टिंगरे कल्याणीनगर येथील अपघाताच्या ठिकाणी व पोलिस ठाण्यात गेले होते. कोणत्याही विधानसभा मतदारसंघात काही घटना घडल्यास लोकप्रतिनिधी तेथे जातात. तशाच प्रकारे टिंगरेही गेले. त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन कोणावरही दबाव टाकला नाही किंवा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांची पाठराखण केली.
अजित पवार एका कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी पुणे शहरात आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री म्हणून मी पोलिसांना आरोपींवर कडक कारवाई करावी, असा सूचना दिल्या आहेत. जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. विरोधकांकडून टीका करण्यात येत असली, तरी तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे अजित पवार म्हणाले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला होता असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी पालकमंत्री या नात्याने कोणत्या ना कोणत्या कामासाठी वारंवार पोलिस आयुक्तांना फोन करत असतो. मात्र, या प्रकरणात मी आयुक्तांना कोणताही फोन केलेला नाही. जर मी पोलिस आयुक्तांना फोन केला असता, तर त्यांना मी या घटनेमध्ये जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना लोकप्रतिनिधी म्हणून केल्या असत्या, असेही ते म्हणाले.
देशातील इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे दारूबंदी आहे, त्याच पार्श्वभूमीवर
महाराष्ट्रात दारूबंदी होईल का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, दारूबंदीचा निर्णय हा धोरणात्मक असतो. नव्याने राज्यामध्ये दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव झाला आहे. त्यानंतर आपण दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देणे बंद केले आहे.
दारूबंदीबाबत नव्याने आलेल्या मागणीबाबत आचारसंहिता संपल्यानंतर विचार करता येईल. सध्या आचारसंहिता असल्याने सहा जूनपर्यंत कोणत्याही धोरणात्मक बैठक किंवा निर्णय घेता येणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील दुष्काळी
परिस्थिती ध्यानात घेता पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर आचारसंहिता शिथिल करावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, 6 तारखेपर्यंत आचारसंहिता शिथिल करणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे ः आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मंत्री शंभुराज देसाई यांनी नोटीस पाठवली आहे. मात्र देसाई यांनी अगोदर पुण्यात यावे मग त्यांचे अधिकारी काय करत आहेत ते बघावं. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अगोदरच कडक नियमावली तयार करून पबमध्ये अल्पवयीन मुलांना जाण्यापासून रोखले असते तर हा प्रकार घडला नसता, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी केले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जैन बोलत होते. या वेळी युवक काँग्रेसचे प्रवक्ता डॉ. नीरज जाधव उपस्थित होते. जैन म्हणाले, रुग्णांना सेवा देण्यात ससून रुग्णालयाचे योगदान मोठे आहे. परंतु, ललित पाटील प्रकरण, सध्याचे अगरवाल प्रकरण या घटनांमुळे रुग्णालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. डॉक्टरांनी सामाजिक उत्तरदायित्व जपायलाच हवे.
हेही वाचा