Onion Pudhari
पुणे

Pune Onion Price Fall: पुण्यात कांद्याचे दर कोसळले; आखाती युद्धाचा फटका

निर्यात ठप्प, हॉटेल मागणी घटली; शेतकरी अडचणीत, दर 9-12 रुपये किलोवर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आखातातील युद्धपरिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळीत झाल्याने शहरातील हॉटेल-खानावळींमधील अनेक खाद्यपदार्थांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, येथून होणाऱ्या कांद्याच्या मागणीत जवळपास 60 टक्क्यांनी घट झाली आहे. तर, यंदा उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात गरवी कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातुलनेत मागणी नसल्याने कांद्याच्या भावात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी घसरण झाली आहे. मागील वर्षभरापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे.

देशातून दुबई, कुवैत आदी आखाती देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र, मागील वीस दिवसांपासून आखातात युध्द भडकले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे उर्वरित देशामध्ये कंटेनर भरून माल नेण्यास निर्यातदार तयार नाहीत. त्यामुळे, सध्या निर्यात ठप्प झाली आहे. याचा परिणाम पुण्यातील बाजारपेठेवरही झाला आहे. निर्यात होत नसल्याने कांद्याचे प्रतिकिलोचे दर 9 ते 12 रुपयांवर आले आहे. जर परिस्थिती सामान्य असती तर कांद्याला किलोला 15 ते 16 रुपयांचा दर मिळाला असता. मात्र, युध्दजन्य परिस्थितीमुळे कांद्याचे समाधानकारक उत्पादन असतानाही दर मिळत नसल्याचे चित्र आहे. बाजारात सध्या पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर येथून कांद्याची आवक होत आहे. येथील बाजारपेठेतून दक्षिण भारतात कांदा मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येत आहे. मात्र, कर्नाटक, विजापूर भागातील कांदाही बाजारात मोठ्या प्रमाणात येत असल्याने राज्यातील कांद्याला तुलनेने कमी उठाव आहे.

परदेशाचा विचार केल्यास सध्या केवळ श्रीलंकेत माल जात आहे. येत्या काळात साठवणूकीतील कांदा येण्यास सुरूवात होणार आहे. सद्यस्थितीत गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज 150 ट्रक आवक होत आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे उत्पादन वाढले आहे. मात्र, विविध कारणांमुळे भाव कमी मिळत आहे. वितरण व्यवस्था, निर्यात धोरण व्यवस्थित नसल्यामुळे हे घडत आहे. यावर पाऊल उचलून सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बाजार शुल्क 5 कोटी 75 लाखांनी घटले

पुणे बाजार समितीमध्ये कांद्याच्या व्यवहारातून 1 एप्रिल 2024 ते 16 मार्च 2025 या कालावधीत 12 कोटी 48 लाख 67 हजार 410 रुपये बाजार शुल्क मिळाले होते. तर दर कमी मिळत असल्याने 1 एप्रिल 2025 ते 16 मार्च 2026 या कालावधीत घटून 6 कोटी 73 लाख, 42 हजार 650 रुपयापर्यंत कमी झाले आहे. एकूण वर्षात 5 कोटी 75 लाख 24 हजार 760 रुपयांनी बाजार शुल्कचे घटल्याची माहिती फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी दिली.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गरवी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आखाती देशातून महाराष्ट्रातील गरवी कांद्याला मोठी मागणी असते. मात्र, युध्दामुळे कांद्याची निर्यात ठप्प आहे. तर, गॅसपुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे. परिणामी, येथून होणाऱ्या मागणीतही मोठी घट झाली आहे. उठाव नसल्याने कांद्याचे दर मंदित आहेत. परिस्थिती सामान्य असती तर किलोमागे सहा रुपये अधिक दर मिळाले असते. कांद्याच्या कोसळलेल्या दराबाबात शासनाने त्वरीत उपाययोजना करावी.
रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड
एप्रिल 2025 पासून कांद्याला कमी भाव मिळत आहेत. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे. कांद्याची वितरण व्यवस्था आणि निर्यात धोरण व्यवस्थित आखाण्याची गरज आहे. एकीकडे महागाई वाढत आहे. रोजगाराची रक्कम, उत्पादन खर्च वाढत आहे. त्यात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेताकुटीला आले आहेत. सरकारने गांभीर्याने विचार करून यातून मार्ग काढून शेतकऱ्याला दिलासा द्यावा.
नितीन थोरात, शेतकरी, आमदाबाद, ता. शिरूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT