पुणे : दिवाळीदरम्यान मोफत वितरित केल्या जाणार्या मिठाईची यंदा अन्न आणि औषध प्रशासनाकडून पाहणी केली जाणार आहे. एफडीएची अशा स्वरुपाची ही पहिलीच मोहीम आहे. मोफत वाटपातील मिठाईचा दर्जा आणि सुरक्षितता कायम राखली जावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाकडून वितरक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांसारख्या फूड बिझनेस ऑपरेटर्सची तपासणी केली जात होती. परंतु, आता दिवाळीदरम्यान मोफत वाटलेल्या मिठाईचीही तपासणी केली जाईल.
भेसळ रोखण्यासाठी आणि पुण्यातील मिठाई विक्री करणार्या फूड बिझनेस ऑपरेटर्सची तपासणी करण्यासाठी सोमवारपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. दिवाळीनिमित्त अनेक संस्था, राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात मिठाई आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांचे वाटप करतात. उपक्रमादरम्यान वाटप करण्यात येणारे मिठाई व खाण्याचे पदार्थ सुरक्षित आणि भेसळमुक्त असल्याची खात्री करण्यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
मोहिमेदरम्यान या खाद्यपदार्थांच्या नमुन्यात भेसळ आहे की नाही हे तपासले जाणार आहे. एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे म्हणाले, 'लोकांच्या आरोग्यास निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व खाण्यायोग्य पदार्थांचे वाटप करताना संबंधितांनी अन्न सुरक्षा नियम आणि स्वच्छतेचे पालन केले पाहिजे. संस्थांनी केवळ नोंदणीकृत खाद्य विक्रेत्यांकडूनच खाण्याचे पदार्थ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
तूप, रवा, खवा, तेल, डाळीचे पीठ आणि सणाच्या काळात मागणी असलेल्या पदार्थांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. मिठाईचे संशयित नमुने भेसळ तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. नागरिकांना निकृष्ट दर्जाची मिठाई आढळल्यास 1800222356 या टोल फ—ी क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा