पुणे

Pune News : दिवाळीनंतर विषाणूजन्य आजारांची दिवाळी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांमुळे वाढलेले प्रदूषण, फराळाच्या पदार्थांवर मारलेला ताव, पर्यटनादरम्यान दगदग अशा विविध कारणांमुळे सध्या विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. विशेषत:, शहर आणि उपनगरांमधील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

हिवाळ्यामध्ये दर वर्षी विषाणूजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. यंदा हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरल्याने आजारांची तीव्रता दर वर्षीच्या तुलनेत वाढलेली दिसत आहे. हवेचे प्रदूषण, तेलकट पदार्थांचे सेवन, विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण यामुळे घशात खवखव, सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, थकवा ही लक्षणे आबालवृध्दांमध्ये दिसून येत आहेत. ज्येष्ठ आणि लहान मुलांमध्ये श्वसनाचे विकारही उद्भवत आहेत. दिवाळीनंतर विषाणूजन्य आजारामध्ये वाढ झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण अधिक आहे.

खोकला, सर्दी, घसा खवखवणे, ताप, उलट्या होणे, अशा सामान्य तक्रारी आढळून येत आहेत, अशी माहिती डॉ. वृषाली बिचकर यांनी दिली. दिवाळीमध्ये आहाराचे सूत्र पाळले न गेल्याने तब्येतीवर परिणाम झाला आहे.त्यामुळे आता हलका आहार घेणे, औषधोपचारांचा डोस पूर्ण करणे आणि जीवनशैली पूर्वपदावर आणणे आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही आजार वाढले…

दिवाळीच्या दरम्यान वाढलेल्या हवा आणि ध्वनिप्रदूषणामुळे डोळयांचे आणि कानांच्या विकारांमध्येही वाढ झाली आहे. याशिवाय, थकवा, मानसिक ताण, डोकेदुखी, निद्रानाश अशा समस्याही दिसून येत आहेत. वेळेवर औषधे घेणे, आराम करणे आणि योग्य आहार घेणे याकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

काय काळजी घ्यावी?

  • आहार हलक्या स्वरूपाचा असावा, तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावे.
  • हवा प्रदूषित झाल्याने तब्येत बरी नसल्यास काही दिवस मॉर्निंग वॉक टाळावे.
  • गरम पाणी पिण्यावर भर द्यावा.
  • औषधे वेळेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
  • घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा.
  • हलक्या स्वरूपाचा व्यायाम करावा.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT