पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांनी तीन दिवसीय 'काम बंद' आंदोलन सोमवारी सुरू केले आहे. ग्रामपंचायत कर्मचार्यांचे वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन तसेच ग्रामपंचायतस्तरावरील प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाकडून संप सुरू केले असल्याचे सांगितले. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सरपंच, ग्रामसेवक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, ग्रामपंचायत संगणकचालक, करवसुली कर्मचारी, सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीजपुरवठा कामगार या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायतीचे कामबंद ठेवण्यात आल्याने गावगाडा ठप्प होणार आहे. सोमवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद प्रशासनाला आंदोलनाचे निवेदन दिले.
ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच उपसरपंच थकीत मानधन अदा करावीत, मानधनात भरीव वाढ व्हावी, मानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी, विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामसेवकांना परत कामावर घेण्यात यावे, नगरपालिका कर्मचार्यांसह ग्रामपंचायत कर्मचार्यांनाही दर्जा देऊन वेतन देण्यात यावे, यासह संगणक चालकांच्या मागण्यांसाठी हे तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबत संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, आम्ही मंत्र्यांना निवेदन दिले आहे. सर्व संघटना एकत्रित येऊन काम बंद आंदोलन करत आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण गावगाडाच ठप्प झाला आहे. गावात पाणी सोडण्यास कर्मचारी नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनी त्यांची दररोजची कामे करावीत, असे आवाहन केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी दिली.
हेही वाचा