पुणे: नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातील सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात पीडितेला घेऊन जाणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी ओळखले. दोन साक्षीदारांनी पीडितेला आरोपीसमवेत शेवटचे पाहिल्याची साक्ष पुण्याच्या विशेष न्यायालयात नोंदवली. शुक्रवारी (दि. 29) सुनावणीच्या पहिल्या दिवशी पाच साक्षीदारांनी साक्ष नोंदवली. त्यामध्ये पीडितेची आई, वडील, पीडितेच्या मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडितेसमवेत पाहणाऱ्या साक्षीदारांचा समावेश आहे.
पीडितेच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करणारा पंचनामा (इन्क्वेस्ट पंचनामा), साक्षीदारांना बजावलेले समन्स आणि त्यांचे जबाब, एफआयआरची प्रत, पीडितेचा जन्मदाखला आदी कागदपत्रे सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर सादर करण्यात आली. तसेच छायाचित्रे, घटनास्थळावरील सीसीटीव्हीतील चित्रीकरण आदी महत्त्वाचे पुरावे मांडण्यात आले. इन्क्वेस्ट पंच, या प्रकरणातील तक्रारदार असलेली पीडितेची आई आणि वडील यांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविण्यात आली.
आरोपीने पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग््राामस्थांनीही न्यायालयासमोर साक्ष नोंदवली. या प्रकरणातील सहाव्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया शनिवारी (दि. 30 मे) सुरू होणार आहे. भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय 65, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात गुरुवारी आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. या खटल्यात एकूण 82 साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या सहा साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयासमोर नोंदवली, तर बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. दरम्यान, आरोपीविरोधात दाखल आरोपपत्रात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्याचा अर्ज सरकार पक्षातर्फे करण्यात आला.
खटल्याचे गांभीर्य लक्षात घेत विशेष न्यायालयाने दररोज सुनावणी घेऊन खटला जलदगतीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरोधात आरोप निश्चित झाल्यानंतर दररोज साक्षीदारांची साक्ष व उलटतपासणीची प्रक्रिया होणार आहे. लवकरात लवकर हा खटला निकाली काढून पीडितेला न्याय आणि समाजात योग्य संदेश देण्यात येईल.ॲड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील