पुणे: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून लोकशाही मूल्यांना हरताळ फासला जात असून, प्रशासनाचा भोंगळ कारभार झाकण्यासाठी सभा एकाच दिवसात गुंडाळली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांनी केला. सदस्यांचे अनेक प्रश्न असताना त्यांना बोलण्यास परवानगी दिली जात नाही. जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज एकाच दिवसात आटोपले जाते, असा आरोप निकम यांनी केला. कॉंग््रेासने देखील याला दुजोरा देत या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग््रेास आणि काँग््रेासच्या सर्व सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सभेच्या सुरुवातीला प्रश्नोत्तराच्या तासांत केवळ दोन प्रश्नांवर चर्चा झाली. यानंतर विषय पत्रिकेला सुरुवात झाली. विषय पत्रिका संपल्यावर विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी सभागृहात सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. अनेक सभासदांना बोलायचे आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे व गुरुवारी पुन्हा सभा घ्यावी, अशी मागणी महापौर मंजूषा नागपुरे यांना केली. मात्र, सभागृह नेते गणेश बिडकर यांनी याला नकार दिला. यामुळे निकम यांनी ही सभा तहकूब करून गुरुवारी घ्यावी, असा प्रस्ताव दिला. मात्र, याला सत्ताधाऱ्यांनी नकार दिल्याने यावर मतदान घेतले गेले. मात्र, मतदानाची वाट न पाहता विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग््रेास आणि कॉंग््रेास सदस्यांनी सभागृहातून बाहेर पडत भाजपच्या भूमिकेचा निषेध केला. दरम्यान, 92 विरुद्ध शून्य मतांनी विरोधकांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यानंतर सभादेखील तहकूब करण्यात आली आहे.
सकारात्मक चर्चेला नकार
आम्ही महापौरांना विनंती केली होती की, अजेंडा दोन-तीन भागांत विभागून सविस्तर चर्चा होऊ द्या. मात्र, सत्ताधाऱ्यांना केवळ विषय मंजूर करून घ्यायचे आहेत, चर्चा नको आहे. पुणेकरांच्या पैशाचा आणि हिताचा विचार न करता ही सभा गुंडाळली जात असल्याने, आम्ही या प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून, सभागृहाचा त्याग केला आहे, असे ॲड. नीलेश निकम यांनी शेवटी स्पष्ट केले.
हुकूमशाही पद्धतीने सत्ताधाऱ्यांचा कारभार: नीलेश निकम
सभा संपल्यावर नीलेश निकम यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी नीलेश निकम म्हणाले, की सत्ताधारी हुकूमशाही पद्धतीने कामकाज करीत आहेत. यापूर्वी जेव्हा महापालिकेत सदस्यसंख्या 85 होती, तेव्हा सर्वसाधारण सभा 4 ते 5 दिवस चालायची. प्रत्येक सभासदाला आपल्या प्रभागातील नागरी समस्या, पर्यावरणाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळत असे. मात्र, आता सदस्य संख्या 165 वर पोहोचलेली असताना केवळ एकाच दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत घाईघाईने विषयपत्रिका संपविण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. सभासदांना विषयपत्रिकेतील ‘डॉक्युमेंट्स’ वाचायलाही वेळ दिला जात नाही, जेणेकरून प्रशासनाचे दोष उघड होऊ नयेत.
प्रशासनाची खोटी उत्तरे आणि महिलांची कुचंबणा
प्रशासनाने विचारलेल्या प्रश्नांना छापील स्वरूपात खोटी उत्तरे दिली असल्याचा दावा निकम यांनी केला. सत्ताधारी पक्ष प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी त्यांच्या चुकांवर पांघरुण घालत आहे. सभेच्या वेळेबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की सकाळी 11 ते रात्रीपर्यंत चालणाऱ्या या सभेमुळे महिला सदस्यांची मोठी कुचंबणा होत आहे. याबद्दल महापौरांना विनंती करूनही त्यांनी प्रोटोकॉल पाळण्यास नकार दिला आहे.
नव्या सभासदांना डावलले
नव्याने निवडून आलेल्या सभासदांना महापालिकेच्या कामकाजाची नियमावली समजावी, यासाठी कार्यशाळा घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, ‘गॅस टंचाई’चे हास्यास्पद कारण सांगून ही कार्यशाळा रद्द करण्यात आली. नव्या सभासदांना ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’ आणि चर्चा यामध्ये सहभागी होऊ दिले जात नसल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रभागातील नागरिकांवर अन्याय होत असल्याचे निकम यांनी नमूद केले.