पुणे: प्रभागात पाणीपुरवठा होत नाही, जो होतो तो अपुरा होतो, अनेक भागांत दूषित पाणी मिळत असून, यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्या भागात ड्रेनेजलाइन नाही, ज्या आहेत त्या जुन्या आहेत, अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही प्रश्नांची दखल घेतली जात नाही, अशा विविध मुद्द्यांवरून नवनिर्वाचित नगरसेवक तब्बल 4 वर्षांनंतर झालेल्या सभागृहात आक्रमक झाले होते. शहरातील नागरी प्रश्नांवरून त्यांनी तक्रारींचा पाढा महापौरांसमोर मांडला. महापौरांनी देखील सर्व प्रश्नांची दखल घेत नगरसेवकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश दिले.
तब्बल चार वर्षांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. 14 मार्च 2022 च्या सांगता सभेनंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर झालेल्या सभेत नवीन नगरसेवक प्रभागातील समस्यांबाबत आक्रमक झाले होते. यामुळे सभागृह चांगलेच तापले होते. प्रभागांतील विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याचा, तर काही भागांत ड्रेनेजचे दूषित पाणी नळांमध्ये मिसळत असल्याचे आरोप नगरसेवकांनी केले. प्रशासनाने तातडीने हे प्रश्न सोडविण्याची मागणी विरोधी पक्षातील नगरसेवकांसह सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी देखील केली. जुन्या नगरसेवकांसोबतच पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांनीही चर्चेत सक्रिय सहभाग घेत प्रशासनाला त्यांच्या प्रभागातील समस्यांबाबत जाब विचारला.
कोंढवा, कौसरबाग, येरवडा, ताडीवाला रोड, वानवडी, सासवड रोड आदी भागांतील प्रश्न ठळकपणे मांडण्यात आले. राष्ट्रवादीचे हाजी गफूर पठाण यांनी कोंढवा व कौसरबाग परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्याचे सांगितले. रमजान महिना सुरू होत असल्याने नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली.
हरिदास चरवड यांनी समाविष्ट गावांतील परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद केले. ग््राामपंचायतीच्या काळात दररोज एक तास पाणी मिळत होते. मात्र, मनपात समावेश झाल्यानंतर दहा मिनिटेही पाणी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. भाजपच्या प्राची आल्हाट यांनी 1997 पासून गावांचा समावेश होऊनही पाणी समस्या कायम असल्याचे सांगितले. माजी महापौर वैशाली बनकर यांनी सासवड रोड परिसरात पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
अश्विनी लांडगे व विशाल मलके यांनी येरवड्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले. काँग््रेासच्या सुमय्या नदाफ यांनी ताडीवाला रोड परिसरात रात्री उशिरा पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा मांडत वेळ बदलण्याची मागणी केली. माजी महापौर प्रशांत जगताप यांनी वानवडी व कोंढवा येथील विस्कळीत पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. काशिद सय्यद यांनी जुन्या पाइपलाइनमुळे गढूळ पाणी येत असल्याचे सांगत दुरुस्तीची गरज व्यक्त केली.
‘समस्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर बैठका घ्या’
सभागृहात नगरसेवकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल महापौर मंजूषा नागपुरे यांनी तत्काळ घेत महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी विभागप्रमुखांसह क्षेत्रीय कार्यालयस्तरावर बैठका घेऊन नगरसेवकांचे त्या त्या परिसरातील प्रश्न सोडवावेत, असे आदेश दिले. पाणी प्रश्नासोबतच विकासकामांबाबतही आयुक्तांनी बैठका घेऊन नगरसेवकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. शहरातील सर्वच भागांतील पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर बैठका घेऊन आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य उपाययोजना कराव्यात, असे आदेशही महापौर नागपुरे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना दिले.
राष्ट्रवादी काँग््रेास-काँग््रेास एकमेकांविरोधात भिडले
तब्बल चार वर्षांनी झालेल्या सभागृहात नगरसेवक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. एकाच वेळी अनेक जण उभे राहून बोलत असल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. कोण कोणता मुद्दा मांडत होते, हे समजत नसल्याने महापौर ‘एकावेळी एकच व्यक्ती बोला’ असे आवाहन करीत होत्या. कॉंग््रेासचे काही नगरसेवक एकाच वेळी बोलत असल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबूराव चांदेरे यांनी सभागृहनेत्यांना सभागृह कोणत्या दिशेला घेऊन जात आहात, एका एकाने मुद्दे मांडावेत, असे म्हणत संताप व्यक्त केला. या वेळी महापौर सर्वांना शांतता राखा, असे म्हणत होत्या. दरम्यान, चांदेरे यांच्या वक्तव्यामुळे कॉंग््रेासचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे चिडले. ‘कुणाला बोलू द्यायचे आणि कुणाला नाही’ हा महापौरांचा अधिकार आहे. चांदेरे यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. आधी स्वतःचे वागणे पाहावे; मग दुसऱ्यांना सांगावे, असे शिंदे म्हटल्याने सभागृहात तणावाचे वातावरण तयार झाले होते. अखेर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी मध्यस्थी करीत दोघांना शांत केले.
काय म्हणाले पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप?
काही भागांतील जुन्या पाइपलाइन बदलून नवीन टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ड्रेनेज विभागाकडून 20 कोटी रुपयांची तरतूद वर्गीकरणाद्वारे
उपलब्ध करण्यात आली आहे. कोंढवा येथील फुटलेल्या पाइपलाइनची दुरुस्ती पूर्ण झाली असून, एक-दोन दिवसांत पुरवठा सुरळीत होईल.
महंमदवाडी परिसरात 14 टाक्या बांधून पूर्ण झाल्या असून, त्या मुख्य पाइपलाइनला जोडण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी वाहतुकीच्या अडचणीमुळे काम प्रलंबित असले, तरी ते लवकरच पूर्ण केले जाईल.
दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींवर तत्काळ भेट देऊन उपाययोजना केल्या जातील.