Mulshi Dam Pudhari
पुणे

Pune Water Supply Project: मुळशी धरणातून पुण्यासाठी ७ टीएमसी पाणी मंजूर

राज्य सरकार व टाटा कंपनीची तत्त्वतः मान्यता; तांत्रिक अभ्यासानंतर प्रकल्पाला गती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाने मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी घेण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तसेच टाटा कंपनीने तत्त्वतः मान्यता दिली आहे. हे पाणी नेमके कसे, कधी व कोठे वापरावे, यासंदर्भात जलसंपदा विभागासह टाटा कंपनीचा तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक संयुक्त गट अभ्यास करणार आहे. पुढील बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. त्यात तांत्रिक मान्यतेबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक असलेले अतिरिक्त पाणी खडकवासला प्रकल्पातून अपुरे पडत आहे. त्यासाठी मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगरसिंचनासाठी वापरता येईल, असा पर्याय पुढे आला होता. त्यानुसार मुळशी धरणातून वाया जाणाऱ्या सुमारे सात टीएमसी पाण्याच्या वापरास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीला आमदार राहुल कुल उपस्थित होते.

राज्य सरकार, टाटाची तत्त्वतः मान्यता

या बैठकीत विखे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच, टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शविली असून, हे पाणी नेमकी कधी, कसे व कोठे वापरायचे, यासंदर्भात अभ्यास गट स्थापन करावा, अशा सूचना विखे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार टाटा कंपनी आणि जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक अभ्यास गट तयार केला असून, यासंदर्भात शास्त्रीय दृष्ट्‌‍या अभ्यास करण्यात येत आहे.

विखे पाटील यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात आयोजित बैठकीत हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यात त्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात येणार आहे. टाटा कंपनी व राज्य सरकारने दिलेल्या मान्यतेनंतर मुळशी धरणातून पुणे शहराला सात टीएमसी पाणी मिळणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानंतर मिळणाऱ्या तांत्रिक मान्यतेनुसार हा प्रकल्प पुढे जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

असे मिळेल पाणी

मुळशी धरणावरून टाटा हायड्रो पावर कंपनीमार्फत भीरा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरले जाते. प्रकल्पाचा एकूण जिवंत पाणीसाठा 18.47 टीएमसी इतका आहे, तर मृत साठा 8.12 टीएमसी इतका आहे. या पाण्यातून तीनशे मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सहा संच वापरण्यात येत आहेत. मुळशी प्रकल्पाच्या भीरा जलविद्युत केंद्रातील 24 टीएमसी वार्षिक पाणीवापरापैकी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत उपलब्ध होणाऱ्या 17 टीएमसी पाण्याद्वारे जास्तीत जास्त वीजनिर्मिती करून उर्वरित सात टीएमसी पाणी वपर 15 ऑक्टोबरनंतरच्या 18.50 टीएमसी पाणीसाठ्यातून आठ महिन्यांमध्ये वीजनिर्मितीसाठी करता येणार आहे. 1.65 टीएमसी बोगदा प्रकल्पासाठी व उर्वरित 9.85 टीएमसीपैकी बाष्पीभवन वजा जाता शिल्लक सात टीएमसी पाणी पूर्वेकडे अर्थात शहरासाठी वळवता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT