पुणे: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरासह नव्याने समाविष्ट गावांचे सूक्ष्म नियोजन करून आपत्ती व्यवस्थापनाची भक्कम तयारी करावी, असे स्पष्ट आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले. आपत्ती निवारणासाठी प्रभागस्तरावर स्वतंत्र टीम तयार करावी, तसेच पावसाळापूर्व कामांबाबत सर्व संबंधित यंत्रणांची तातडीने संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी मंगळवारी दिले.
मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त माधव जगताप तसेच अधिकारी उपस्थित होते.
महापौरांनी स्पष्ट केले की, पावसाळ्यापूर्व कामांमध्ये महापालिका, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, महावितरण, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड यांचा समन्वय अत्यावश्यक आहे. ओढे-नाल्यांची सफाई, कल्व्हर्टची दुरुस्ती, रिटेनिंग वॉलची मजबुतीकरणाची कामे वेळेपूर्वी पूर्ण करावीत.
आवश्यक असल्यास पावसाळी वाहिन्यांच्या आराखड्यात सुधारणा करावी आणि नाल्यांचे संपूर्ण मॅपिंग पूर्ण करावे. धोकादायक वाडे व इमारतींचे सर्वेक्षण करून नोटिसा द्याव्यात, तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या तातडीने छाटाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या. विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी पावसाळी वाहिन्या शक्यतो पदपथांच्या खालून टाकण्याचा सल्ला दिला, जेणेकरून रस्त्यांची वारंवार तोडफोड टळेल.
एका ठेकेदाराला तीनच कामे
पावसाळापूर्व कामांच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने यंदा गुणवत्ता राखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. अनेकदा निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा कमी दराने मंजूर केल्या जात असल्याने कामांचा दर्जा घसरतो, अशी नोंद बैठकीत झाली. या पार्श्वभूमीवर, एका ठेकेदाराला जास्तीत जास्त तीनच कामे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. यामुळे ठेकेदारांवरील ताण कमी होईल आणि कामांचा दर्जा सुधारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.