शंकर कवडे
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ठेवण्यात आलेला बंद तसेच शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक वाढली. आवकच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे मटार, सिमला मिरची आणि काकडीच्या भावात सुमारे दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे.
तर, आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे केवळ हिरवी मिरचीच्या भावात वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात रविवारी (दि.1) 110 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत जास्त आहे. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो राजस्थान येथून गाजर सुमारे 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, कर्नाटका आणि गुजराथ येथून भुईमूग शेंग प्रत्येकी 1 टेम्पो, मध्यप्रदेश, राजस्थान येथून मटार 25 ते 26 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 3 ते 4 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो, तर इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा 30 ते 35 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 500 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 2 ते 3 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, गवार 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेटस, काकडी 7 टेम्पो, ढोबळी मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी 10 ते 12 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, घेवडा 4 ते 5 टेम्पो, पावटा 2 ते 3 टेम्पो, कांदा 125 टेम्पो आवक झाली.
पालेभज्या स्थिर
गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 1) सुमारे 1 लाख जुडी कोथिंबिर, तर मेथीची 60 हजार जुडींची आवक झाली. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण विभागातून पालेभाज्यांची आवक होत आहे. पुढील काही दिवस पालेभाज्या स्थिर राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.