शंकर कवडे
पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. रविवारी (दि. २६) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रकमधून शेतमाल दाखल झाला.
मात्र, पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून मालाला कमी उठाव राहिला. त्यामुळे, बटाटा, भेंडी, काकडी, फ्लॉवर आणि ढोबळी मिरचीच्या भावात १० टकक्यांनी घट झाली. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, हिमाचल प्रदेश, कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग शेंग २ टेम्पो, इंदौर येथून गाजर ७ ते ८ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी २ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश येथून मटार प्रत्येकी २ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ८ ते १० टेम्पो, इंदौर, आग्रा, आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा ४० ते ४५ टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेटस, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ६ ते ७ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग शेंग ३० ते ४० गोणी, कांदा ७० ते ८० टेम्पो इतकी आवक झाली.
पालेभाज्यांत स्वस्ताई
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालेभाजी विभागात आवक वाढली आहे. मात्र, सलग पावसामुळे पालेभाज्यांच्या दर्जात घसरण झाल्याने मागणी मंदावून भावातही घट झाली आहे. रविवारी (दि. २६) बाजारात तब्बल २ लाख जुडींची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत ती पन्नास हजार जुड्यांनी वाढली. परिणामी, घाऊक बाजारात जुडीमागे तब्बल २० रुपयांनी घट झाली. तर मेथीची ७० हजार जुडी आवक झाली. ही आवक स्थिर असली तरीही मागणी अभावी मेथीच्या भावात जुडीमागे १० रुपयांनी घट झाली आहे. याबरोबरच कांदापातच्या भावात १० रुपये, शेपूच्या भावात ८ रुपये, चाकवत, करडई, मेथी आणि राजगिराच्या भावात प्रत्येकी २ रुपये आणि अंबाडी अणि चवळईच्या भावात प्रत्येकी २ रुपयांनी घट झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. बाजारात दर्जेदार मालालाच ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.