पुणे: उत्पादनात घट झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात पपईची आवक अद्याप रोडावलेलीच आहे. त्यातच अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पपईला मागणी वाढली आहे. आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने पपईच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.
यंदा पावसाने जूनपर्यंत ओढ दिल्याने सीताफळाचा हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे बाजारातील सीताफळाची आवक अद्याप अपेक्षेपेक्षा कमी आहे. दुसरीकडे, श्रावणातील उपवासामुळे सीताफळाला चांगली मागणी असल्याने त्याच्या दरातही दहा टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.
मोसंबीची आवक मात्र मागणीच्या तुलनेत अधिक असल्याने तिच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. उर्वरित फळांची आवक आणि मागणी स्थिर असल्याने त्यांचे दर टिकून असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
रविवारी (दि. १६) लिंबू १००० ते ११०० गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्रा ४ ते ५ टन, डाळिंब १४० ते १५० टन, पपई ९ ते १० टेम्पो, कलिंगड ७ ते ८ गाड्या, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू १००० डाग, पेरु ४०० ते ५०० क्रेट, सीताफळ ३ ते ४ टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ४०० ते १२००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२६० (४ डझन) : ३०-१००, संत्रा : (१० किलो) : १५०-५५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-१३०, आरक्ता : २५-८०, गणेश : १०-३०, कलिंगड : ८-१०, खरबूज : १५-३०, पपई : १५-४०, चिक्कू (दहा किलो) : २००-६००, पेरू (२० किलो) : ४००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१२०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००, सफरचंद (१० ते १३ किलो) : १६०० ते २१००.