पुणे: पुण्यातील टोळीयुद्धात गावठी पिस्तुलांचा वाढता वापर पाहता पुणे शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातील पिस्तूलनिर्मितीचे केंद्र असलेल्या उमरटी गावात धाड टाकली होती. त्यामुळे पुण्यात थेट उमरटीतून येणाऱ्या गावठी पिस्तुलांना गेल्या काही दिवसांत लगाम बसला होता. परंतु, चार दिवसांपूर्वी पुण्यातील एका सराईताने उमरटीतून चार गावठी पिस्तुले खरेदी करून पुण्यात आणली. याप्रकरणी दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी दोनच्या पथकाने बुधवारी (दि.4) रात्री शिवाजीनगर परिसरात पकडले. त्यांच्याकडून चार गावठी पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे असा 1 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोहित दुर्गेश धर्माधिकारी (24, प्रियदर्शननगर, जुनी सांगवी, शेवट बसस्टॉप) आणि अभिषेक राजू टेंकल (23, रा. विष्णूकृपानगर, जुने शिवाजीनगर बसस्टॅंड, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीच बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक शिवाजीनगर परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, प्रशांत शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
रेकॉर्डवरील आरोपी रोहित धर्माधिकारी हा शिवाजीनगर येथील ज्ञानेश्वर पादुका चौकात येणार असून, त्याच्याकडे गावठी पिस्तुले आहेत. त्यानुसार पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गौरव देव, कर्मचारी दिलीप गोरे, रवींद्र रोकडे, अनिल कुसाळकर, पवन भोसले, अमोल राऊत, गणेश खरात यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशी करून अंगझडती घेतली असता दोघांजवळ चार गावठी पिस्तुले आढळली. पोलिसांनी ती जप्त केली.
अशी आखली एमपीतून पिस्तुले आणण्याची योजना
आरोपी रोहित हा सराईत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा सांगवीत एकासोबत वाद झाला होता. त्यामुळे त्याने मध्य प्रदेशातील उमरटीतून गावठी पिस्तुले आणण्याची योजना आखली. त्यासाठी त्याने तळेगाव येथील सिद्धू नावाच्या मित्राला सोबत घेतले. चार दिवसांपूर्वी मोटारीतून हे दोघे उमरटी गावात पोहोचले. पुणे पोलिसांच्या कारवाईचा धसका तेथील गावठी पिस्तुले तयार करणाऱ्यांनी घेतला असल्यामुळे दोघे पिस्तुले घेण्यासाठी आल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना गावातून ठरलेल्या ठिकाणी घेऊन गेले. तेथे या दोघांनी चार पिस्तुले विकत घेतली. त्यानंतर ते पुण्यात आले. चारपैकी एक पिस्तूल रोहितने आपला मित्र अभिषेकला दिले, तर तीन पिस्तुले आपल्याजवळ ठेवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कोंढवा-येवलेवाडी येथील रिक्षाचालक गणेश काळेच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल आरोपींनी मध्य प्रदेश-धुळे सीमेवरून आणल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड घेण्यासाठी त्याचा भाचा स्वराज वाडेकरने जानेवारी 2025 मध्ये अमन शेखला 45 हजार रुपये रोख दिले होते. या पैशांतून अमनने मध्य प्रदेश-धुळे सीमेवरील उमरटी येथून दोन पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे व दोन कोयते खरेदी केली. याच शस्त्रांचा वापर करून आरोपींनी वनराजच्या खून प्रकरणात अटक आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळेवर गोळ्या झाडून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी टोळीप्रमुख कृष्णकांत ऊर्फ कृष्णा बंडू आंदेकर (वय 28), सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय 69), स्वराज निलंजय वाडेकर (वय 25, तिघे रा. नाना पेठ) आणि आमीर ऊर्फ चिन्या आसीर खान (वय 25, रा. कोंढवा) या चौघांना पुणे पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटद्वारे अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांच्यासह 14 जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल केला आहे. गणेश किसन काळे (वय 30, रा. येवलेवाडी) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना एक नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास खडी मशीन चौकाजवळ घडली होती.
पिस्तुले आंदेकरकडेच ठेवली होती
माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात पिस्तूल पुरविल्याप्रकरणी समीर काळेला अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा भाऊ गणेश काळे रिक्षाचालक होता. आंदेकर टोळीचे सदस्य अमन शेख, अरबाज पटेल व दोन अल्पवयीन मुलांनी गणेशवर पिस्तुलातून गोळीबार आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला. पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बरवाना जिल्ह्यातील उमरटी गावात बेकायदा पिस्तुले तयार करणाऱ्या भट्ट्या उद्ध्वस्त करत सात जणांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींनीच गणेश काळेच्या खुनासाठी वापरलेली दोन पिस्तुले, काडतुसे आणि कोयत्यांची विक्री केल्याचे तपासात उघड झाले. आंदेकर टोळीच्या सदस्यांनी ही हत्यारे खरेदी करून टोळीप्रमुख कृष्णा आंदेकर व बंडू आंदेकरकडे दिल्याची कबुली आरोपींनी दिली.
आंदेकर बापलेकासह चौघांना पोलिस कोठडी
वनराजच्या खुनाचा सूड घेण्यासाठी टोळीप्रमुख बंडू व कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर व आमीर खान यांनी गणेश काळेच्या खुनाचा कट रचला. टोळीचे सदस्य अमन शेख, अरबाज पटेल, मयूर वाघमारे यांनी अल्पवयीन मुलांमार्फत गणेश काळेवर गोळीबार व कोयत्याने वार करून खून केला. आरोपींनी हा कट कोठे व कधी रचला, त्यांचे आणखी कोण साथीदार होते, याबाबत तपास करायचा आहे. आंदेकर टोळीने आणखी काही पिस्तुले, काडतुसे, हत्यारे आणली आहेत का, याबाबत आरोपींची चौकशी करून घराची झडती घ्यायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक आयुक्त नमता देसाई आणि विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.