पुणे: हातात पुस्तक आणि मनात मोठं स्वप्नःकधी आई-वडिलांसोबत कचरा गोळा करताना, तर कधी दिवसभराच्या कामानंतर रात्री अभ्यास करताना त्यांनी आयुष्याशी लढा दिला आणि अखेर बारावीच्या परीक्षेत यश मिळवत कष्टाचे चीज केले. त्यामुळे या यशाने मुलींच्या नव्हे, तर कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजळवला असून, जीवनात उत्तुंग भरारी घेण्याचे बळ मिळाले आहे. कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्थेच्या सदस्यांच्या या मुलांनी ‘परिस्थिती नव्हे, तर जिद्दच यश ठरवते’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
संध्या कांबळे हिने बारावीच्या परीक्षेत (वाणिज्य शाखा) 82.17 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिचे आई-वडील स्वच्छ संस्थेमार्फत हडपसरमध्ये घरोघरी कचरा संकलनाचे काम करतात. संध्याने बारावीत यश मिळवत आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. संध्या आता पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.
श्रुती लोंढे हिने बारावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण प्राप्त केले आहेत. वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी वाढली, त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे तिला अवघड जात होते. पण, तरीही तिने लक्ष केंद्रित करून अभ्यास केला. बहिणीच्या पाठिंब्याने आणि संस्थेच्या मदतीने तिने शिक्षणाची वाट सोडली नाही आणि यश मिळविले. माझे पुढे जाऊन डिप्लोमा करून वास्तुविशारद बनायचे स्वप्न आहे, असे ती सांगते.
पूजा रावत हिनेही (वाणिज्य शाखा) 72.83 टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे. आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांना नवे बळ दिले. तिच्या बारावीच्या यशात पालकांचा खूप मोठा वाटा आहे. कोथरूडमधील वस्तीत राहणारी पूजा पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
कुटुंबात बारावी उत्तीर्ण करणारी पहिली व्यक्ती
दीपाली माने हिने (वाणिज्य शाखा) 85.67 टक्के गुण मिळवत आपल्या कुटुंबात इतिहास रचला. पिंपरी-चिंचवडमध्ये घंटागाडीवर काम करणाऱ्या वडिलांची मुलगी असलेल्या दीपालीवर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. मात्र, तिच्या जिद्दीने आणि संस्थेच्या मदतीने ती पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यानंतर दीपालीने अकरावीत प्रवेश घेतला आणि मेहनत घेऊन यश मिळवले आहे. आपल्या कुटुंबातील बारावी उत्तीर्ण करणारी दीपाली पहिली व्यक्ती आहे.
कुटुंबात शिक्षण घेणारी एकमेव मुलगी
संगीता निर्मल हिने 74.83 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे. ती वारजे येथील रामनगर वस्तीत राहते. संगीता सध्या त्यांच्या घरात शिकणारी एकमेव मुलगी आहे. तिने बारावीचा अभ्यास खूप चिकाटीने आणि जिद्दीने केला. त्यात तिच्या आईने देखील खूप मेहनत आहे. संगीताच्या वडिलांचे 2020 साली निधन झाले. त्यानंतर तिची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईने घेतली व तिचे शिक्षण पूर्ण करण्यात सिंहाचा वाटा दिला. तिला पुढे एमबीएचे शिक्षण घ्यायचे आहे.