पुणे: गोड, रसाळ गावरान आंब्याचा सुगंध मार्केट यार्डातील फळबाजारात दरवळू लागला आहे. यंदा मोहोर बहरात असतानाच लहरी हवामानाचा फटका बसल्याने गावरान आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. एरवीच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन 30 टक्क्यांवर आले आहे. सद्य:स्थितीत मार्केट यार्डात दर्जेदार आंब्याची 50 ते 400 रुपये डझन या दराने विक्री करण्यात येत आहे.
कोकण, कर्नाटक हापूसनंतर पुणेकर जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या गावरान हापूसची वाट पाहतात. मात्र, यंदा रत्नागिरीप्रमाणेच गावरान हापूसकडूनही नागरिकांच्या पदरी निराशा पडत असल्याचे चित्र आहे. 20 मेपासून गावरान हापूसचा हंगाम सुरू झाला आहे.
सध्या हंगाम बहरण्याचा काळ असला तरी बाजारात अपेक्षित आवक होताना दिसत नाही. दर वर्षी याकाळात बाजारात 250 ते 300 डाग तयार मालाचे बाजारात येत असतात. यंदा मात्र 50 ते 60 डागच आवक झाली आहे. मुळशी तालुक्यातील बेलावडे, उरावडे, मांडवी, खेचरे या भागांतून ही आवक होत आहे.
गावरान हापूसची आवक अत्यल्प आहे. लहरी हवामानाचा यंदा गावरान आंब्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सद्य:स्थितीत जवळपास 30 टक्के आंबा बाजारात आहे. हापूस संपल्याने आंब्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बाजारात कर्नाटक आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने गावरानला मागणी कमीच राहिली.यशवंत कोंडे, गावरान हापूसचे व्यापारी
जानेवारी महिन्यात झाडांना चांगली मोहोर धारणा झाली होती. मात्र, त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळून गेला. अडीचशे झाडांपैकी केवळ वीस ते तीस झाडांवरच फळे टिकून आहेत. रविवारी बाजारात 25 डागांतून आंबे विक्रीसाठी आणले होते. त्यांपैकी जवळपास 125 डझन आंब्याला 350 ते 450 रुपयांचा दर मिळाला.विलास पायगुडे, शेतकरी, मांडवी बुद्रुक, ता. हवेली.