पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमवर निर्बंध लावण्यावरून दरवर्षी वाद निर्माण होतो. गणेशोत्सव तोंडावर आला की प्रशासनाकडून नियम आणि निर्बंधांची चर्चा सुरू होते. हा वाद कायमचा संपविण्यासाठी शासनाने साउंड सिस्टिमच्या वापराबाबत एकदाच स्पष्ट आणि कायमस्वरूपी नियमावली तयार करावी. त्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेऊन निश्चित केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
विशेष म्हणजे, हे नियम केवळ गणेशोत्सवापुरते न ठेवता सर्व उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना समान असावेत, अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहरप्रमुख वसंत मोरे यांनी मांडली. विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमवरील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मोरे म्हणाले, “दरवर्षी गणेशोत्सव आला की साउंड सिस्टिम किती असावी, त्यावर कोणते निर्बंध असावेत, यावरून वाद उफाळतो.
असे दरवर्षी होण्यापेक्षा शासनाने एकदाच सर्वांना विश्वासात घेऊन नियम निश्चित करावेत. पुणेकरांचा आवाज आणि त्यांच्या भावनांचाही निर्णय घेताना विचार झाला पाहिजे. शासनाचा जो निर्णय असेल, त्यानुसार उत्सव साजरा झाला पाहिजे.”
नियमावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे
शासनाने केवळ नियमावली जाहीर करून थांबू नये, तर तिची प्रत्यक्ष अंमलबजावणीही झाली पाहिजे, असे सांगत मोरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. “नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर नियम करून उपयोग काय? विरोधकांना लक्ष्य करणे आणि काहींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
साउंड सिस्टिमबाबत निर्बंध असतील तर ते सर्वांना समान असले पाहिजेत. गणेशोत्सवापुरते वेगळे निकष नकोत. एकदा नियम ठरवून त्यांची समान आणि कठोर अंमलबजावणी केली, तर दरवर्षी निर्माण होणाऱ्या वादाला कायमचा पूर्णविराम मिळेल,” असे मोरे यांनी स्पष्ट केले.