पुणे: शहरात मंगळवारी सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने अवघ्या २४ तासांत अनेक भाग जलमय झाले. शहरात १२१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, १२६ ठिकाणी पाणी साचल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. धोक्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने कारवाई करत १,०४० नागरिकांचे सुरक्षितस्थळी हलवले. शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून, सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून मदत व बचावकार्य सुरू आहे.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक २०६.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औंध-बाणेर परिसरात २०३.५० मि.मी., तर कात्रज-कोंढवा भागात १८६.५० मि.मी. पाऊस झाला. या भागांसह शहरातील अनेक सखल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.
नांदेड फाटा येथील शांतिनिकेतन परिसर, हडपसर, बोपोडी, वारजे, बाणेर तसेच इतर पूरग्रस्त भागांतील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. स्थलांतरित नागरिकांसाठी महापालिकेने विविध शाळा, समाजमंदिरे आणि इतर सार्वजनिक इमारतींमध्ये तात्पुरती निवारा केंद्रे उभारून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केली आहे. मदतकार्यात ५० स्वच्छता निरीक्षक, ५० स्वच्छता पर्यवेक्षक, सुमारे ४ हजार सफाई कर्मचारी, ५० फवारणी कर्मचारी, ४०० मुकादम आणि १४० विशेष पथके कार्यरत आहेत. याशिवाय २२ पोकलेन, ६७ जेसीबी, २९ डंपर, ४ रोबो, ३ जेटर आणि ९ पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने पाणी उपसा, रस्ते मोकळे करणे आणि अडथळे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालये, अग्निशमन दल, पोलिस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू ठेवले आहे. नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूरबाधित भागात तातडीने उपाययोजना करा: आयुक्तांच्या सूचना
संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरबाधित भागांमध्ये तातडीने आणि युद्धपातळीवर काम करावे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. पाणी साचलेली ठिकाणे, झाडे पडण्याच्या घटना आणि संभाव्य धोकादायक भागांवर सातत्याने लक्ष ठेवून त्वरित उपाययोजना कराव्यात. पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये अन्न, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधांची कोणतीही कमतरता राहू देऊ नये. नियंत्रण कक्ष आणि क्षेत्रीय कार्यालयांनी चोवीस तास सतर्क राहून नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकार्यांना दिले.
अनेक सखल भाग पाण्याखाली
पावसाचा जोर आणि पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या व सखल भागातील २९७ कुटुंबांमधील १,१०५ नागरिकांना महापालिकेने सुरक्षित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित केले आहे. सर्वाधिक बाधित झालेल्या येरवड्यातील शांतीनगरमधून १५० कुटुंबे (५२५ नागरिक), वाकडेवाडी-पाटील इस्टेटमधून ६२ कुटुंबे (२४० नागरिक) आणि बोपोडीच्या आदर्शनगरमधून ५० कुटुंबांचे मनपा शाळांमध्ये सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी पाणी साठण्याच्या १४५, झाडपडीच्या १७२, सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याच्या ३५ आणि भिंती पडण्याच्या १६ घटनांची नोंद झाली आहे.
आपत्ती निवारणासाठी यंत्रणा झाली सज्ज
महापालिकेने ४,००० सफाई कर्मचारी, ७७ डी-वॉटरिंग पंप, ४२ फॉगिंग मशिन्स आणि ७७ डिझेल पंपांच्या मदतीने चोकअप झालेल्या ड्रेनेज लाइन्स साफ करून पाण्याचा निचरा सुरू केला आहे. पूरबाधित ४९ ठिकाणी तातडीने मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी ०२०-२५५०१२६९ आणि ०२०-२५५०६८०० हे क्रमांक २४ तास खुले ठेवण्यात आले आहेत.