

जेजुरी: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वारकरी, भाविक आणि पालख्यांच्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली असताना, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील बेलसर टोल नाक्यावर आळंदीकडे जाणाऱ्या माउलींच्या वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केला जात असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शासनाकडून टोलमाफीची घोषणा झाल्यानंतरही संबंधित यंत्रणांकडे आदेश पोहोचण्यात विलंब झाल्याने वारकऱ्यांनाच टोल भरावा लागत असल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित प्राधिकरण कोणती भूमिका घेणार, याकडे वारकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत जेजुरी टोल व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, आम्हाला अजून तसा शासन निर्णय प्राप्त झालेला नाही. अधिकृत आदेश मिळाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले.