पुणे: जिल्ह्यात हत्तीपाय (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजाराचा ‘सायलेंट’ प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने रात्री विशेष पथके तैनात करून सक्रिय सर्वेक्षण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हा हा राज्यातील नियमित फिलेरियासिस सर्वेक्षणात समाविष्ट नसला, तरी जानेवारी 2026 पासून आतापर्यंत 44 रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे स्थलांतरित कामगार आहेत.
विशेष पथके वर्षभर कार्यरत राहणार असून, उच्च-जोखमीच्या भागांमध्ये आणि असुरक्षित गटांमध्ये तपासणीवर भर दिला जाणार आहे. स्थानिक स्वयंसेवक आणि आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकांनी तपासणीला सहकार्य करावे, यासाठी आधीपासून कल्पना देऊन जनजागृती केली जाणार आहे. मायक्रोफिलेरिया रात्री रक्तात सक्रिय असल्याने रक्तनमुनेही रात्रीच घेतले जाणार आहेत.
अनेक रुग्णांच्या रक्तात मायक्रोफिलेरिया असतात, पण तपासणी न झाल्यास ते निदर्शनास येत नाहीत. अशा रुग्णांमुळे डासांमार्फत संसर्ग पुढे पसरू शकतो. स्थलांतरितांची मोठी संख्या आणि झपाट्याने होणारे शहरीकरण लक्षात घेता पुण्यात सक्रिय सर्वेक्षण सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विशेष मोहीम रात्री का ?
हत्तीपाय (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजारात मायक्रोफिलेरिया नावाचे सूक्ष्म परजीवी रात्रीच्या वेळी रक्तात जास्त प्रमाणात दिसतात. दिवसा ते शरीराच्या खोल भागात लपलेले असतात, त्यामुळे तपासणीत सहज सापडत नाहीत. म्हणूनच रक्तनमुने रात्री घेतल्यास निदान अधिक अचूक होते.
संक्रमित व्यक्ती लवकर ओळखता येते. पुढील प्रसार रोखणे सोपे होते.
क्युलेक्स डासही प्रामुख्याने रात्री चावतात, त्यामुळे त्या वेळेत संसर्ग साखळी सक्रिय असते. त्यामुळे सर्वेक्षण आणि नमुना संकलन रात्री केल्यास अधिक प्रभावी ठरते.
कोठे होणार सर्वेक्षण?
स्थलांतरित कामगारांची वसाहत (मजूर वसाहती, बांधकाम साईट्स).
झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्तीचे परिसर.
स्वच्छतेची कमतरता असलेले भाग (पाणी साचणारे, नाल्याजवळील क्षेत्र).
ज्या ठिकाणी आधी रुग्ण आढळले आहेत, असे क्लस्टर एरिया या ठिकाणी रात्री पथके जाऊन रक्तनमुने घेणार.
संभाव्य रुग्ण शोधणार आणि गरजेनुसार उपचार व जनजागृती करणार.
संसर्ग लवकर ओळखणे आणि स्थानिक पातळीवर पसरणे थांबवणे.
हा आजार अनेक वर्षे शरीरात सुप्त स्वरूपात राहतो. लक्षणे दिसायला 5 ते 15 वर्षे लागू शकतात. मात्र, या काळात संक्रमित व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘हत्तीपाय’ हा डासांद्वारे पसरणारा आजार असून परजीवी जंतूमुळे होतो. संक्रमित क्युलेक्स डासांच्या चाव्यामुळे हा संसर्ग होतो. लहानपणी संसर्ग होऊन शरीरातील लसिका प्रणालीवर हळूहळू परिणाम होतो. पुढील आयुष्यात सूज, ‘हत्तीपाय’ आणि पुरुषांमध्ये अंडकोष सूज अशी गंभीर लक्षणे दिसतात.डॉ. अपर्णा पाटील, जिल्हा मलेरिया अधिकारी