आशिष देशमुख
पुणे: कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेमधूनच बाहेर पडल्याचे अनेक परिस्थितीजन्य भक्कम पुरावे मिळाले असून, आता कोरोनापेक्षा कितीतरी पटीने घातक विषाणू एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्याचे प्रयोग जगातील अनेक प्रयोगशाळांत सुरू असण्याची शक्यता पुण्यातील जगद्विख्यात शास्त्रज्ञ डॉ. मोनाली रहाळकर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळेच असे प्रयोग करणाऱ्या जगातील प्रयोगशाळांकडे लक्ष ठेवणे खूप गरजेचे असून, प्रत्यक्ष युद्ध भूमीवरील नव्हे तर या नव्या जैविक युद्धाला तोंड देण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
कोविड-19 ने जगभरातील सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक व्यवस्थेला मोठे आव्हान दिले. या महाभयंकर विषाणूने कोट्यवधी लोकांचा जीव घेतला आणि अजूनही त्याच्या उगमाविषयी असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. कोविड विषाणू नैसर्गकिपणे म्हणजेच वटवाघळांमधून एखाद्या प्राण्यामध्ये आला आणि मग त्याने माणसाला संक्रमित केले, असे कुठलेही पुरावे आजपर्यंत सापडले नाहीत. त्याच्या उलट प्रयोगशाळेमधून तो बाहेर पडला असावा, याचे अनेक परिस्थितीजन्य पुरावे पुण्यातील जगद्विख्यात शास्त्रज्ञ डॉ. मोनाली रहाळकर यांनी जमा केले आहेत. कोविड महामारी प्रयोगशाळेतून सुरू झाली असावी, त्यामुळे येणाऱ्या काळात जगामध्ये जिथे जिथे विषाणूंवर घातक प्रयोग होत आहेत, त्यावर योग्य अंकुश ठेवला पाहिजे, असा सावधानतेचा इशाराच त्यांनी दिला आहे.
कोरोनाचा विषाणू हा चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेतून अथवा त्यांच्याशी संलग्न अन्य प्रयोगशाळांमधून कृत्रिम पद्धतीने किंवा नैसर्गिक विषाणूमध्ये बदल करून तयार झाला असावा, याचे अनेक परिस्थितीजन्य पुरावे हाती आले आहेत. 2021 मध्ये भारतामधून एका शास्त्रज्ञ दाम्पत्याने कोरोनाचा विषाणू हा प्रयोगशाळेमधून आला असावा, असे सांगितले होते. हे दाम्पत्य डॉ. मोनाली रहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर होय. डॉ. मोनाली रहाळकर ह्या पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे पती डॉ. राहुल बहुलीकर हे बायफ संस्थेत शास्त्रज्ञ आहेत. कोरोना काळात जेव्हा पहिल्या लाटेचा हाहाकार सुरू होता तेव्हापासून कोविडचा उगम, यावर वैयक्तिकरीत्या संशोधन केले. जगभरात यावर शोध घेणाऱ्या मोजक्या मंडळींच्या संपर्कात आले. त्यांनी एक जागतिक दर्जाचा शोधनिबंध लिहून वुहानमधील शास्त्रज्ञांना अनेक प्रश्न विचारून कोंडीत पकडले होते. या दाम्पत्याने ‘तो नक्की कुठून आला? कोविडच्या उगमाचे रहस्य’ हे पुस्तक 2025 मध्ये मराठीतून लिहिले. आता याची इंग््राजी आवृत्ती ई-बुक स्वरूपात नुकतीच प्रकाशित केली आहे (व्हेअर डीड कोवीड 19 व्हायरस कम फ्रॉम? द मिस्ट्री सॉलव्हिंग रेस). कोविडच्या उगमस्थानाचा छडा त्यांनी अनेक पुरावे सादर करत लावला, त्यावरच हे पुस्तक आहे. त्यांच्या संशोधनाची दखल भारत सरकारने सन 2021-22 मध्ये घेतली.
आव्हाने आणि उपाय
येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे, त्याला जैवतंत्रज्ञानाची जोड दिली, तर जगात हाहाकार होऊ शकतो, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वटवाघळासंबंधीचे काम जेव्हा सुरू झाले तेव्हा गुहा, लेण्यांमधून त्यांची विष्ठा गोळा करून ती प्रयोगशाळेत आणली, त्या विषाणूंचा जीनोम तयार केला गेला, तो कृत्रिमरीत्या तयार करून मग कृत्रिम विषाणूची पैदास केली गेली.
तसाच प्रकार बर्ड फ्लूच्या बाबतीत, निपाह विषाणूच्या बाबतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रयोगशाळेतील हे घातक संशोधन हा प्रकार म्हणजे नुसता वेळेचा आणि पैशाचा अपव्यय नसून आगीशी खेळ आहे.
ज्याप्रमाणे आपण अणुबॉम्ब किंवा शस्त्रसंबंधी किंवा वेगवेगळे नियम लावतो तसेच या संभावित महामारी निर्माण करण्याजोग्या विषाणूंसाठी लावले पाहिजे.
ही बंधने ठरावीक देशांवर न राहता त्याची अंमलबजावणी ही जागतिक स्तरावर झाली पाहिजे.
आज जगाच्या कानाकोपऱ्यात जे काही अशा स्वरूपाचे संशोधन चालू आहे, त्याचे पुनरावलोकन करून आवश्यकता नसेल.
डॉ. रहाळकर यांचे संशोधनात्मक चिंतन काय सांगते...
कोरोनाचा विषाणू संशोधन करताना बाहेर पडला असावा.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून वुहान आणि अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथील एका प्रयोगशाळेत सार्स कोरोना विषाणूंवर काम चालायचे. अमेरिकेचे आर्थिक साहाय्य प्रकल्पांना मिळायचे.
कोविडची महामारी सुरू झाल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकल्प बंद देखील केला होता.
या किंवा अन्य प्रकल्पांच्या कामांमधून कोविडच्या विषाणूची निर्मिती झाली असावी. 2021 ते 2025 या काळात महत्त्वाच्या गुप्तहेर खात्यांनी म्हणजेच (सीआयए, एफबीआय, डीओई) कोविड प्रयोगशाळेतून आला असावा, असे सांगितले आहे.
ट्रम्प सरकारने व्हाईट हाऊसच्या संकेतस्थळावर देखील एप्रिल 2025 मध्ये जाहीर केले आहे की, हा विषाणू प्रयोगशाळेतून (वुहानच्या) बाहेर पडला असावा.
डॉ. मोनाली रहाळकर यांचा 2021 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुलाखतींमध्ये सहभाग होता. त्यांना याबद्दल नवदुर्गा पुरस्कार, रोटरी पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. मोनाली आणि डॉ. राहुल हे संशोधक दाम्पत्य भारतामधून पहिले आणि एकमेव आहेत, जे याबद्दल उघडपणे बोलतात.
कोविडच्या साथीमध्ये तब्बल दोन कोटी मनुष्यहानी जगभरात झाली, असे आता समजते. 25 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आर्थकि नुकसानीचा अंदाज आहे.
एआय तंत्रज्ञान वापरून कृत्रिम विषाणू तयार करण्याचे व त्यांना अधिक घातक करण्याचे प्रयोग जगभरात होऊ शकतात. त्यामुळे भारताने सावध राहणे गरजेचे आहे.
गेली अनेक वर्षे बर्ड फ्लू संक्रमणावर जगभरातील प्रयोगशाळांत विघातक संशोधन (गेन ऑफ फंक्शन) सुरू आहे. 2014 ते 2017 मध्ये त्यावर बंदी घातली होती. पण, ती नंतर काढून टाकली गेली.