पुणे: यंदा मान्सून हंगामावर अल निनोचे सावट असतानाही जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे दुष्काळाचे सावट दूर झाले. तसेच धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. जुलैअखेर जिल्ह्यात सरासरीच्या तब्बल १६९.१ टक्के पाऊस बरसला आहे.
यंदा जून कोरडाच गेला. त्यामुळे भयंकर दुष्काळाची भीती वाटत होती. मात्र, १ ते ९ जुलैदरम्यान यंदाच्या हंगामातील पहिला पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत पाणी मुरले. कोरडी जमीन भिजली. मात्र, १० ते १९ जुलैदरम्यान दहा दिवसांच्या खंडाने पुन्हा बळीराजा काळजीत पडला होता.
जुलै कोरडा जातो की काय ? असे वाटत असताना थबकलेला मान्सून जिल्ह्यात सक्रिय झाला आणि २० जुलै पासून घाटमाथ्यावर अतिवृष्टी, तर जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. यंदाच्या पावसाने जिल्ह्यात बरेच विक्रम केले. जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६९.१ टक्के पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.