खडकवासला: पुणे शहर परिसरात टोळीयुद्ध आणि दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. यामुळे नागरिकांत असुरक्षिता निर्माण झाली आहे. रात्री दहानंतर पब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णयामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल. हा निर्णय कायमस्वरूपी लागू करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने (आप) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, महासचिव सुभाष करांडे, सुनील सवदी, सागर झा, मिलिंद सरोदे, अविनाश भाकरे, उमेश दीक्षित, अनिकेत शिंदे, ज्योती जोगदंड, मनोज ओझा आदींनी पोलिस आयुक्तांना याबाबतचे निवदेन दिले. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात दोन आठवडे जमावबंदी लागू केली. तसेच रात्री दहानंतर पब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल बंद ठेवण्याची अमंलबजावणी सुरू केली.
सिंहगड रोड, वारजे, धायरी, नऱ्हे, कात्रज, आंबेगाव, धनकवडी, बिबवेवाडी, हडपसर आदी भागांत संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यामुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत नागरिकांच्या शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी या वेळी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्याचे बेनकर यांनी सांगितले.