पुणे: उन्हाळी सुट्यांमुळे शिबिरांची कमी झालेली संख्या... असह्य उकाड्यामुळे रक्तदात्यांचे घटलेले प्रमाण... सुट्यांमध्ये नियोजित शस्त्रक्रियांचे वाढलेले प्रमाण...अशा विविध कारणांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
रक्ताचे नाते ट्रस्टचे संचालक राम बांगड म्हणाले, ‘पुण्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालयांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील बऱ्याच रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसह अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होतात. पुण्यात इतर ठिकाणांपेक्षा शस्त्रक्रियांसाठी काहीसा कमी खर्च येत असल्याने विविध राज्यांमधून, देशांमधून रुग्ण शस्त्रक्रियांसाठी सुट्यांमध्ये येतात. त्यामुळे रक्ताची मागणी ‘न भूतो न भविष्यती’ अशी वाढली आहे.’
आकडे काय सांगतात?
शहरातील रक्तपेढ्यांची संख्या 48.
सरकारी नियमाप्रमाणे एका रक्तपिशवीची किंमत 1700 रुपये. रक्तपेढ्यांकडून एका पिशवीसाठी 2200-2300 रुपये, तर रुग्णालयांकडून 2800-3300 रुपये आकारले जातात.
पुण्यात दररोज अंदाजे रक्ताच्या 1500 पिशव्यांची गरज भासते. संकलित होण्याचे प्रमाण 600 ते 800 पिशव्या इतकेच आहे.
सध्या एबी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताचा अनेक सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांकडून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. त्यांनी संकलित केल्याच्या एकूण रक्तापैकी 10 टक्के रक्त त्यांना प्राधान्याने आणि सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. मात्र, रक्तपेढ्यांकडून तितकेसे सहकार्य मिळत नाही. शासनाचेही यावर नियंत्रण नाही. रक्तदान हे सामाजिक कार्य असून, त्यामध्ये परस्परपूरक भूमिका घ्यायला हवी. रक्तदात्यांनाही सन्मानाची वागणूक मिळायला हवी.राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट
सध्या जनकल्याण रक्तपेढीमध्ये रक्ताच्या पिशव्या दिल्या जात आहेत. मात्र, साठा दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे आणि तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी 20 टक्के जास्त आहे. साधारणपणे दररोज 60-70 पिशव्यांची मागणी असते, सध्या हा आकडा 90 पर्यंत पोहोचला आहे. शिबिरांची संख्या न वाढल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. उन्हाचा कडाका वाढला असला तरी रक्त सुरक्षित पद्धतीने संकलित करण्यासाठी रक्तपेढ्या सज्ज आहेत. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे.अतुल कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढी