पुणे: ’लहान वयातच मुला-मुलींमध्ये वाचनाची आवड रुजविण्यासाठी पुणे बाल पुस्तक जत्रेसारखे उपक्रम अतिशय महत्त्वाचे असून, त्यातून वाचन संस्कार जपण्याचे मोलाचे कार्य केले जात आहे,’ असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. 1) केले.
धावपळीच्या युगात नव्या पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळा, समाज आणि सरकारने एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाउंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेला रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली.
या वेळी ’श्वासात राजं, ध्यासात राजं’ या कार्यक्रमातील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते अजय पूरकर, गायक अवधूत गांधी, कार्यक्रमाचे संयोजक कुशल खोत, लेखक-दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अभिनेते प्रवीण तरडे, समन्वयक सुनील महाजन आदी उपस्थित होते.
पुणे बाल पुस्तक जत्रेचे शेवटचे दोन दिवस
अक्षरांच्या दुनियेत रमण्याची आणि पारंपरिक खेळांचा आनंद लुटण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या ’पुणे बाल पुस्तक जत्रे’चे आता अवघे दोन दिवस उरले आहेत. जत्रेत रविवारी (दि. 3) आणि सोमवारी (दि. 4) होणाऱ्या विविध कार्यक्रमांची मेजवानी लहान मुलांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, मुलांनी शनिवारीही (दि. 2) आपल्या कुटुंबीयांसोबत जत्रेत सहभागी होत विविध उपक्रमांचा आनंद लुटला. जत्रेला लहान मुले आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.