Shri Sant Dnyaneshwar Maharaj Sanjeevan Samadhi Sohala
आळंदी : खेळ मांडीयेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।।
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ।।
टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भक्तिकल्लोळ..., 'माउली-माउली'चा अखंड जयघोष... वैष्णवांच्या मेळ्याने बहरून आलेला इंद्रायणीचा काठ... माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा... अशा वातावरणाने शुक्रवारी (दि. १४) अलंकापुरी दुमदुमून गेली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात शनिवारी (दि. १५) एकादशी असल्याने पूर्वसंध्येला मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून आळंदीमध्ये दिंड्या दाखल झाल्या आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिक उत्पत्ति एकादशीच्या भक्ती पर्वणीचा योग साधण्यासाठी शुक्रवारी शेकडो दिंड्यांतून हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले. इंद्रायणी घाटावर अनेकांनी फुगडीचा फेर धरला, तर काहींनी टाळ-मृदूंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला.
पहाटेपासूनच वारकऱ्यांच्या राहुट्या व धर्मशाळांमधून अभंगाच्या सुरावटी निघू लागल्या आहेत. टाळ- मृदंगाचा गजराने आसमंत भरून गेला होता. स्नानासाठी इंद्रायणीच्या तीरावर वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. कार्तिक वारीसाठी इंद्रायणीला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याप्रमाणे भाविकांची भक्तीही जणू दुथडी भरून वाहत होती.
दुसरीकडे माउलींच्या मंदिरामध्ये पहाटेपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. स्नानानंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी पूर्णपणे भरून गेली होती. यंदाच्या सोहळ्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आळंदी नगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पहाटे - १ वाजता - माऊलींच्या समाधीवर ११ ब्रम्हवृंदांच्या वेदघोषात पवमान अभिषेक व दुधारती, दुपारी - १२ ते १२.३० वाजता - महानैवद्य, १ वाजता - श्रींची नगरप्रदक्षिणा, रात्री ८.३० वाजता - धुपारती, रात्री १२ ते २ वाजेपर्यंत श्री. मोझे यांच्या तर्फे जागर. उद्या रविवारी (दि. १६) रोजी कार्तिक वद्य द्वादशी असून या दिवशी माऊलींचा रथोत्सव परंपरेनुसार पार पडणार आहे.