MPSC  Pudhari
पुणे

MPSC Students: प्रथमेश देशमुखच्या मृत्यूने स्पर्धा परीक्षार्थी संतप्त; ‘ही आत्महत्या नव्हे, परीक्षा व्यवस्थेचा बळी’

परीक्षांना विलंब, पेपरफुटी, निकाल व नियुक्त्यांमधील दिरंगाईवर विद्यार्थ्यांचा संताप; कुटुंबाला भरीव आर्थिक मदत आणि परीक्षा व्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर संतप्त स्पर्धा परीक्षार्थींनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. संबंधित तरुणाची आत्महत्या नसून भ्रष्ट अन्‌ दिरंगाईने ग्रासलेल्या परीक्षा व्यवस्थेने घेतलेला हा बळी असल्याची भावना व्यक्त केल्या आहेत. प्रथमेशच्या कुटुंबाला शासनाने तत्काळ भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

ग्रामीण भागातून कष्टकरी कुटुंबातून डोळ्यांत हजारो स्वप्ने घेऊन विद्यार्थी पुण्यात येतात. परीक्षांचा होणारा विलंब, वाढता आर्थिक भार आणि मानसिक ताण यांमुळे अनेकदा तरुण मन खचून जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व युवक-युवतींना नम्र आवाहन आहे. तुमचे आयुष्य कोणत्याही परीक्षेपेक्षा, नोकरीपेक्षा किंवा कर्जापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे. संकटे कितीही मोठी असली, तरी संवाद साधा. आई-वडील, मित्र, कुटुंब किंवा समुपदेशकांशी बोला. खचून जाऊ नका, कारण तुमच्या कुटुंबाला 'अधिकारी' नाही, तर 'तुम्ही' जिवंत हवे आहात. कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नका. कोणतेही अपयश संकट हे आयुष्यभरासाठी नसतात.
संग्राम नरळे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रतिनिधी
विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, तर याला सरकार जबाबदार आहे, याला प्रशासकीय दिरंगाई जबाबदार आहे. विद्यार्थ्यांसमोर आज वाढते वय, सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, असे विविध प्रश्न 'आवासून' उभे आहेत, वेळेवर परीक्षा होत नाहीत, वेळेवर निकाल लागत नाही, परीक्षा झाल्या तरी नियुक्त्या वेळेवर मिळत नाहीत, अनेक परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. याला जबाबदार कोण आहे. विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर सरकारने ठोस निर्णय घेऊन दिलासा द्यावा.
महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
गेल्या काही वर्षांपासून पेपरफुटी आणि इतर गोष्टींचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होताना दिसून येत आहे. कित्येक विद्यार्थी जे ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी पुण्यासारख्या शहरांमध्ये येतात आणि या ठिकाणी त्यांच्या पदरी घोर नराशा पडते. ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून आहे, असा आमचा आरोप आहे.
डॉ. राहुल ससाणे, आंबेडकरी कार्यकर्ता
प्रथमेशच्या मृत्यूवर केवळ श्रद्धांजली देऊन हा विषय संपणार नाही. जबाबदारी निश्चित करा, दोषींवर कारवाई करा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करा आणि विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करा.
अक्षय जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस (प्रसारमाध्यम विभाग)
धाराशिव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याची आत्महत्या ही केवळ एका तरुणाची गळफास नसून, भ्रष्ट आणि दिरंगाईने ग्रासलेल्या परीक्षा व्यवस्थेने घेतलेला हा बळी आहे. ग्रामीण भागातील आई-वडील पोटाला चिमटा काढून लेकरांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहतात. परंतु पेपरफुटी, निकाल व भरती प्रक्रियेतील अनिश्चिततेमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. सरकारने परीक्षा व्यवस्थेचे हे पाप थांबवून या गैरप्रकारांची तातडीने उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
नितीन आंधळे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रतिनिधी
पेपरफुटी व गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळतोय. दुसऱ्या बाजूला संपूर्ण कुटुंब विद्यार्थ्यांच्या स्वप्नासोबत पणाला लागलेले असते. कारण आजूबाजूचा समाज त्या संपूर्ण कुटुंबाला विद्यार्थ्यांच्या अपयशाबद्दल वेठीस धरत असतो. ही आत्महत्या संपूर्ण समाजव्यवस्थेला आणि शासन यंत्रणेला काळजी करायला लावणारी आणि सूचक आहे.
लेशपाल जवळगे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रतिनिधी
परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जायला लागते. घरची परिस्थिती आणि बेरोजगारीचा तणाव असह्य होत असतानाच एमपीएससीकडून परीक्षाचे निकाल लागायला आणि नियुक्ती मिळायला ३-४ वर्षे लागत आहेत. एकूणच या सगळ्या व्यवस्थेला विद्यार्थी कंटाळले आहेत. त्यामुळेच टोकाची पावले उचलली जात आहेत.
तुषार तळेकर, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रतिनिधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT