पुणे: दरवर्षी पावसाळा जवळ आला, की महापालिकेकडून नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, पहिल्याच पावसात रस्ते पाण्याखाली गेल्यावर या नालेसफाईचा फुगा फुटतो. कंत्राटदारांच्या याच ‘कागदी सफाई’ला आणि भष्टाचाराला चाप लावण्यासाठी महापालिका आता थेट ‘रोबोटिक’ तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.
शहरातील नालेसफाई प्रत्यक्षात झाली की नाही, हे तपासण्यासाठी आता भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरविले जाणार आहेत. येत्या 15 जूननंतर या रोबोटिक पाहणीला सुरुवात होणार असून, काम व्यवस्थित न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिला आहे.
मान्सूनपूर्व सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेताना अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर यांनी सर्व कामे वेळेत, दर्जेदार आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिले. या वेळी शहरात होणाऱ्या नाले आणि पावसाळी वाहिन्यांच्या सफाईबाबत दरवर्षी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष नालेसफाई होते की नाही, हे तपासण्यासाठी आता रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे नायर यांनी सांगितले.
अचानक होणार तपासणी
महापालिका हद्दीत एकूण 49 हजार 656 स्टॉर्म वॉटर चेंबर्स (पावसाळी वाहिन्यांचे चेंबर) आहेत. या सर्व वाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित साफसफाई करणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे. या अवाढव्य यंत्रणेपैकी तब्बल 1500 ते 2000 पावसाळी वाहिन्यांची आणि चेंबर्सची रोबोटच्या माध्यमातून ‘रँडम’ (अचानक) तपासणी केली जाणार आहे. या डिजिटल ऑडिटमुळे कंत्राटदारांनी सफाई केली की केवळ बिल लाटण्यासाठी कागदोपत्री कामे केलीत, याचा जिवंत पुरावा थेट पालिकेच्या हाती येणार आहे.
पायलट प्रोजेक्ट ठरला यशस्वी!
शहरातील पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरमध्ये कामगार उतरवून किंवा वरवर पाहणी करून नालेसफाईचा दर्जा तपासणे कठीण होते. यावर उपाय म्हणून पालिकेने अत्याधुनिक रोबोटिक यंत्रणा शोधून काढली आहे. हा रोबोट थेट चेंबरच्या आत जाऊन स्वच्छतेची अचूक पाहणी करतो आणि त्याचा थेट अहवाल प्रशासनाला देतो. गेल्या आठवड्यात शहरातील 19 चेंबर्समध्ये या रोबोटचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबविण्यात आला होता. ही प्रायोगिक चाचणी अत्यंत यशस्वी ठरल्याने आता प्रत्यक्ष मैदानावर रोबोट उतरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
गाळ रस्त्यावरच ठेवला तर खैर नाही!
नालेसफाई करताना अनेक ठिकाणी कंत्राटदार नाल्यातून काढलेला ओला गाळ शेजारीच रस्त्यावर टाकून देतात. पहिल्याच पावसात हाच गाळ वाहून पुन्हा चेंबरमध्ये जातो आणि लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जातो. या गंभीर बाबीची दखल घेत अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले की, ‘असा गाळ रस्त्यावर टाकल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ पालिकेला फोटो पाठवावेत. दोषींवर आणि बेजबाबदार कंत्राटदारांवर तत्काळ कडक कारवाई केली जाईल.’