पुणे: महापालिकेच्या पाच शाळा खासगी सहभागी तत्त्वावर 'द आकांशा फाउंडेशन’ला चालवण्यास देण्यावरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता ९ वर्षांऐवजी ३ वर्षे कालावधीसाठी शाळा चालवण्यास देण्याची भूमिका सत्ताधारी भाजपने घेतली आहे. आता हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. दरम्यान, ज्या संस्थांना महापालिकेच्या शाळा या योजनेअंतर्गत घ्यायच्या आहेत, त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केले.
आकांक्षा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात शाळा चालवत आहे. सध्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. या उपक्रमासाठी टेंडर प्रक्रियेद्वारे सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च केला आहे, असे बीडकर यांनी सांगितले.
बीडकर म्हणाले, महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या एका विद्यार्थ्यामागे सुमारे ३८ हजार रुपये खर्च होत आहे. सध्या आकांक्षा फाउंडेशनला एका विद्यार्थ्यामागे ५५ हजार रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे महापालिकेने यात पुढाकार घेऊन आर्थिक सहाय केल्यास आणखी शाळा घेता येईल, असा प्रस्ताव ठेवला होता.
पालिकेने मदत केल्यास एका विद्यार्थ्यांमागे सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार १२ कोटी दरवर्षी महापालिकेला द्यावे लागणार आहे.
इतर शैक्षणिक संस्थांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा तपासण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे ऑडिट महापौरांच्या अध्यक्षतेखाली केले जाणार आहे. यासाठी स्वतंत्र अभ्यासगटही स्थापन करण्यात येणार आहे. या मॉडेलच्या अनुभवाच्या आधारे महापालिकेच्या इतर शाळांमध्येही हा प्रकल्प राबविण्याचा विचार सुरू असून एमआयटी, सिम्बायोसिस आणि सिंहगडसारख्या शैक्षणिक संस्थांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.