पुणे: राज्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम-पोषण) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील पात्र शाळांना शिक्षण विभागाने ११ कलमी सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना पौष्टिक व संतुलित आहार मिळावा तसेच आहार तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांना देण्यापर्यंतच्या प्रक्रियेत स्वच्छतेचे काटेकोर पालन व्हावे, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.
राज्यातील पात्र शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पीएम-पोषण योजनेअंतर्गत पोषण आहार दिला जातो. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिने, तर उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिने असलेला आहार देणे अपेक्षित आहे. त्यासाठी भारतीय अन्न महामंडळामार्फत प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी दररोज १०० ग्रॅम, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवला जातो. पोषण आहार पुरवठादाराकडून मिळणारा तांदूळ व धान्यादी माल योग्य दर्जाचा आणि मागणीनुसार योग्य वजनाचा असल्याची खात्री करूनच तो स्वीकारावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पोषण आहार शिजवण्याची जागा, स्वयंपाकाची भांडी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वयंपाकी व मदतनीसांनी ॲप्रन, टोपी वापरण्यासह हात स्वच्छ धुण्याच्या नियमांचे पालन करावे. विद्यार्थ्यांनी मैदानात किंवा मातीवर बसून जेवू नये, यासाठी स्वच्छ बैठक व्यवस्था करण्याची सूचना आहे. शाळेच्या आवारापासून ५० मीटर परिसरात उच्च फॅट्स, साखर व मिठाचे प्रमाण असलेल्या (एचएफएसएस) तसेच प्रतिबंधित जंक फूडच्या विक्रीस बंदी आहे. याबाबत शाळेच्या दर्शनी भागात फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेत अन्न सुरक्षा फलकही लावणे आवश्यक आहे.
माता पालकांकडून चव तपासणी
विद्यार्थ्यांना आहार देण्यापूर्वी माता पालकांकडून आहाराची चव घ्यावी. त्यांचा अभिप्राय चव नोंद रजिस्टरमध्ये नोंदवणे बंधनकारक केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी आहाराची दैनंदिन चव घेऊन गुणवत्ता तपासावी.
भरारी पथकांकडून अचानक तपासणी
जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकांनी शाळांना नियमितपणे अचानक भेटी देऊन पोषण आहाराची गुणवत्ता व स्वच्छतेची तपासणी करावी. प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी आणि आहार घेतलेल्या विद्यार्थ्यांची दैनंदिन नोंद एमडीएम पोर्टल तसेच नोंदवहीत करावी. तांदूळ व धान्याचा वापर, शिल्लक साठा आणि खर्चाचे लेखे अद्ययावत ठेवण्याचेही निर्देश आहेत. पुरवठादारांचे करारनामे संबंधित पंचायत समिती, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे.