पिंपळे गुरव : नवी सांगवी ते बाबूराव घोलप विद्यालयदरम्यान गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत. वाहतूककोंडीत भर नवी सांगवी ते बाबूराव घोलप विद्यालयदरम्यानच्या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
नवी सांगवी बसस्थानक मार्गावरून हा रस्ता सांगवी फाट्याकडे जातो. हा वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असल्याने सकाळ आणि संध्याकाळ अवजड वाहनांची गर्दी पाहायला मिळते. प्रामुख्याने सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील नागरिक पुण्याकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे चालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवित आहेत. या रस्त्यावरची वाहतूक मिलेट्री भागातून वळविण्यात आली असली, तरी अवजड वाहन जाऊ शकत नसल्यामुळे परिसरात वाहतूककोंडी कायम आहे. गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे.
परिसरातील अनेक रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूककोंडीत वाढ होत आहेत. तसेच, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. नवी सांगवी ते बाबूराव घोलप विद्यालयदरम्यान रस्त्याचे काम सुरू असताना वॉर्डन काही वेळा नसतो. संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सर्व प्रलंबित कामे करण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.
हेही वाचा