पुणे

Pimpri News: बदनामी करण्यासाठी बोगस तक्रारींचा आधार

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या तथ्यहीन अर्जांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. चालू वर्षात 36 निनावी अर्ज आल्याची नोंद आहे. मागील काळातही खात्यातील उच्चपदस्थ पोलिस अधिकार्‍यांसह काही प्रतिष्ठित नागरिकांची नावे असलेले अर्ज जाणीपूर्वक व्हायरल करण्यात आले होते.

अनेक तक्रारी तथ्यहीन

पोलिसांविरोधात जाणीवपूर्वक निनावी अर्जाद्वारे खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. ही बाब शासनाच्या देखील निदर्शनास आली आहे. दरम्यान, गृह विभागाने खोट्या तक्रारदारांना चाप बसावा, तसेच खर्‍याखुर्‍या तक्रारींना योग्य न्याय मिळावा, यासाठी एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये अर्ज चौकशी बाबत तपासी अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, करण्यात आलेल्या चौकशीमध्ये निनावी अर्जातील आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर येऊ लागले आहे. तसेच, केवळ बदनामी करण्याच्या हेतूने अशा प्रकारचे अर्ज केल्याचे निष्पन्न झाले आहे. विनाकारण बदनामी करणार्‍या कंटकांना चाप लावण्यासाठी प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची
गरज आहे.

शहराला बोगस अर्जांची परंपरा

ज्या तक्रारीमध्ये असंबंध आरोप आहेत, अशा तक्रारीदेखील तक्रारदाराची तपासणी न करता दप्तरी दाखल करण्यात याव्यात, असा निर्णय गृहविभागाकडून घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील काळातदेखील पोलिस आयुक्तांच्याविरोधात बोगस अर्ज करण्यात आले होते. त्या वेळी अर्जदार म्हणून जाणीवपूर्वक चुकीची नावे देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये बोगस अर्जाची परंपरा असल्याचे बोलले
जात आहे.

बोगस तक्रारींमुळे मनोबलावर परिणाम

खोट्या, दिशाभूल तक्रारीमुळे शासनाच्या साधन संपत्तीवर, तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होतो. बोगस व निनावी तक्रारी अर्जाच्या वाढत्या तपासांमुळे खर्‍याखुर्‍या तक्रारदारांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ज्या तक्रारीमध्ये तक्रारदाराचे नाव, पत्ता नमूद केलेला नाही, अशा निनावी तक्रारीमध्ये कोणत्याही स्वरुपाची माहिती अंतर्भूत असली तरीही त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये, असे शासनाने यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी दप्तरी दाखल करण्यात याव्यात, असेही अधिकार्‍यांना सुचित करण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या नावाची खातरजमा

दखल घेण्यासारखे आरोप केले असल्यास अशा तक्रारींचे संबंधात प्रशासकीय विभागाने दखल घ्यावी. सक्षम प्राधिकार्‍याच्या मान्यतेने तक्रारदाराने स्वतः तक्रार केली आहे की नाही, याबाबत खात्री करून घेण्यात यावी. याबाबत तक्रारदाराकडून 15 दिवसांमध्ये प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. तक्रारदाराने आपण स्वतः तक्रार केल्याचे मान्य केल्यास, अशा तक्रारीवर कार्यवाही करताना तक्रार अर्जदाराचे नाव, पत्ता झाकून तक्रारीची छायांकित प्रत काढून ती चौकशीसाठी यंत्रणेकडे पाठवावी, असे परिपत्रकात नमूद आहे.

गृह विभागाकडून आलेल्या सूचनेनुसार तक्रारी अर्जांचे निवारण करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी तसेच, नुकतेच आलेल्या परिपत्रकानुसार निनावी अर्ज दप्तरी दाखल करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.

– सतीश माने, पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड

हेही वाचा

SCROLL FOR NEXT