पाटस: पाटस (ता. दौंड) जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ही निवडणूक राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात थेट व प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून पाटस गटात दोन्ही पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीने अनेक डावपेच सुरू असल्याने निवडणूक कोणाच्या पारड्यात जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाटस जिल्हा परिषद गटातील कुरकुंभ गणामध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाला अधिकृत पक्षचिन्ह मिळालेले नाही; मात्र स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद व कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनेही या मतदारसंघात आपली ताकद लावली आहे. पाटस गणातून यापूर्वी राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून निवडून आलेल्या व दौंड पंचायत समितीचे सभापती पद भूषवलेल्या आशा नितीन शितोळे यांच्या पतीराजाला भाजपने यंदाच्या निवडणुकीत पंचायत समिती गणाचे तिकीट दिल्याने पाटस गणात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
पाटस जिल्हा परिषद गटात व परिसरातील रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, बंदिस्त गटार योजना, आरोग्य व रुग्णसेवा, सामाजिक व महिलांचे प्रश्न, विद्यार्थी व रोजगाराचे प्रश्न, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न हे यंदाच्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. यासोबतच जिरायती भागातील रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा, कुसेगाव आदी गावांना बारमाही पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तलाव व पाणीपुरवठा योजनांचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.दरम्यान, पाटस परिसरातील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरती मर्यादित न राहता, भीमा-पाटस साखर कारखाना तसेच आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, मतदार कोणाला कौल देतात याबाबत उत्सुकता वाढली आहे.