पारगाव: आंबेगाव तालुक्यात वाढलेल्या कडक उन्हाचा मोठा फटका कैऱ्यांच्या उत्पादनाला बसू लागला आहे. तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने झाडांवरील कैऱ्या पिवळट होत गळून खाली पडत आहेत. या गळतीमुळे शेतकऱ्यांच्या हंगामातील उत्पन्नावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांच्या बांधांवर आंब्यांच्या विविध जातींची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. दरवर्षी कैऱ्यांची विक्री ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा हंगामी उत्पन्नाचा स्त्रोत ठरतो. कैऱ्यांपासून लोणचे, पन्हे, कच्चा माल यासाठी मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगले दरही मिळतो. त्यानंतर येणाऱ्या पिकलेल्या आंब्यांच्या विक्रीतूनही चांगले अर्थार्जन होते.
यंदा मात्र कैऱ्यांना उष्णतेचा प्रचंड तडाखा बसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अनेक कैऱ्या पिवळसर पडून वेळेआधीच गळत आहेत. काही ठिकाणी जमिनीवर पडलेल्या कैऱ्या उष्णतेमुळे लगेच खराब होत असल्याने त्याचा विक्रीवरही प्रतिकूल परिणाम दिसत आहे. आंबा उत्पादक देवराम टेमगिरे यांनी सांगितले की, उन्हाळ्याची तीवता एवढ्या प्रमाणात वाढेल असे वाटले नव्हते. कैऱ्यांची वाढ व्यवस्थित होत असतानाच कडक उन्हामुळे गळती वाढू लागली आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पन्न घटणार आहे.