नरेंद्र साठे
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग काम करीत आहे. दोन्ही पालखी सोहळ्यात वारकर्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाकडून आरोग्यदूत नेमले आहेत. या आरोग्यदूतांच्या माध्यमातून वारकर्यांना त्यांच्या जागेवर येऊन प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत.
वारकर्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी औषधांचे किट तयार केले आहे. ठिकठिकाणी रुग्णवाहिका असणार आहेत. मात्र, पालखी मुक्काम किंवा विसाव्याच्या ठिकाणी एखाद्या आजारी व्यक्तीला रुग्णवाहिका शोधत त्याठिकाणी यावे लागते. त्यामुळे वारकरीही उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. हे टाळण्यासाठी आणि वारकर्यांना आहे त्या ठिकाणी वेळेत औषधोपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाकडून आरोग्यदूत नेमण्यात आले आहेत.
दोन्ही पालखी मार्गांसाठी एकूण 30 आरोग्यदूत नेमले आहेत. ते दुचाकीवरून पालखी सोहळ्यात वारकर्यांना जागेवर जाऊन आरोग्य सेवा देणार आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडे प्राथमिक उपचाराचे सर्व साहित्य असणार असून, त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांचा ड्रेसकोड असणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : 15 आरोग्यदूत
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा : 15 आरोग्यदूत
आरोग्यदूत हे वारकर्यांना त्यांच्या जागेवर जाऊन औषधौपचार करतील. रक्त तपासणी, ताप, सर्दी, खोकला असल्यास त्यांची तपासणी करून औषध देणे, तसेच जखम झाल्यास त्यावर उपचार करणे, ही सर्व कामे हे आरोग्यदूत करणार आहेत.
डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.
हेही वाचा