ओतूर: ओतूर आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय सुसज्ज इमारत, एक्स-रे सह अत्याधुनिक सुविधा आणि आवश्यक साधनसामग्रीने सज्ज असतानाही मनुष्यबळाअभावी अक्षरशः 'आजारी' पडल्याचे चित्र आहे. डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णालयातील उपलब्ध सुविधांचा अपेक्षित वापर होत नसल्याने उपचारासाठी नागरिकांना नारायणगाव, जुन्नर आणि मंचरला जावे लागत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट व सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई दांगट यांनी केली आहे. ओतूर ग्रामीण रुग्णालयाची इमारत आणि उपलब्ध वैद्यकीय साधनसामग्री पाहता हे रुग्णालय परिसरातील हजारो नागरिकांसाठी आरोग्याचा मोठा आधार ठरू शकते.
मात्र, 'सुविधा आहेत पण त्या वापरण्यासाठी कर्मचारी कुठे?' असा सवाल आता नागरिकांनी केला आहे. डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. काही कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या इतरत्र करण्यात आल्याने ओतूर ग्रामीण रुग्णालयातील मनुष्यबळाची समस्या आणखी गंभीर झाली आहे. परिणामी, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. रुग्णसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.
उपचारांसाठी दुसऱ्या शहराचा रस्ता
ओतूरसह परिसरातील अनेक गावांतील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, आवश्यक डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने साध्या उपचारांसाठीही नारायणगाव, जुन्नर किंवा मंचर येथे जाण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक उद्भवलेली वैद्यकीय समस्या, अपघात किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे.
सुविधा कागदावर
शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज रुग्णालयाची इमारत उभारली, विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या; मात्र त्या सुविधा कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळच नसेल तर या पायाभूत सुविधांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
रिक्त पदे भरण्याची मागणी
रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, तात्पुरत्या बदल्यांमुळे निर्माण झालेली मनुष्यबळाची कमतरता दूर करावी आणि २४ तास पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू राहण्यासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. शासनाने पूर्ण क्षमतेने आरोग्यसेवा सुरू करण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.