ओतूर : ओतूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याच्या हालचालींवर वनविभागाने वेळीच नियंत्रण मिळवले आहे. गाढवपट येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (दि. १९) पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास बिबट मादी जेरबंद झाली.
ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्रीमती एस. एम. बुट्टे, वनरक्षक के. एस. खरोडे (उदापूर) तसेच वनकर्मी किसन केदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जेरबंद बिबट मादीला सुरक्षितरीत्या माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले आहे.
वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पकडलेल्या बिबट मादीचे वय सुमारे १ ते १.५ वर्षे आहे. अलीकडे परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांच्या घटना व बिबट्याच्या हालचालींची नोंद होत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. वनविभागाच्या या कारवाईमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना, रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे व पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.