तंत्रशिक्षण डिप्लोमासाठी आता कॅपच्या तीनऐवजी चार फेर्‍या! मॅनेजमेंट कोट्यातील मनमानीला बसणार चाप File Photo
पुणे

तंत्रशिक्षण डिप्लोमासाठी आता कॅपच्या तीनऐवजी चार फेर्‍या! मॅनेजमेंट कोट्यातील मनमानीला बसणार चाप

विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, वास्तुकला आणि फार्मसी या अभ्यासक्रमांच्या डिप्लोमाच्या (पदविका) प्रवेश प्रक्रियेत कॅपच्या तीनऐवजी चार प्रवेश फेर्‍या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे संस्थास्तरावर प्रवेशाच्या जागा रिक्त राहणार नाहीत. एक प्रवेश फेरी वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. तसेच, संस्थांच्या मॅनेजमेंट कोट्यातील मनमानीला देखील चाप बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डिप्लोमाच्या प्रवेश नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) आणि वास्तुकला परिषद यांच्या अंतर्गत येणार्‍या विविध संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश

प्रक्रियेसाठी हा नियम लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे संस्थात्मक कोट्यातील व सर्व प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पार पाडावी लागेल. यात संस्थांना पात्र उमेदवारांची यादी, गुणवत्ता यादी, प्रवेश वेळापत्रक आदी गोष्टी संकेतस्थळावर प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत.

चौथ्या फेरीतील प्रवेशातही मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ

डिप्लोमाच्या तीन प्रवेश फेर्‍यांनंतर अनेक अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहत. त्यानंतर संस्थास्तरावर प्रवेश करण्यास अनुमती दिली जात होती. परंतु, संस्थास्तरावर प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही.

त्या पार्श्वभूमीवर अजून एक प्रवेश फेरी घेण्याची मागणी पालकांकडून होत होती. अखेर विद्यार्थिहिताचा विचार करून आणखी एक प्रवेश फेरी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीतून प्रवेशाची संधी मिळणार आहे. याद्वारे मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ प्राप्त होणार आहे.

प्रवेश कन्फर्म करणे अनिवार्य

विद्यार्थ्यांना आता पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळण्यासाठी चौथ्या फेरीपर्यंत प्रयत्न करता येणार आहे. पहिल्या फेरीत पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. आता नव्या निर्णयानुसार दुसर्‍या फेरीत पसंतीनुसार पहिल्या तीन क्रमांकांत आणि तिसर्‍या फेरीत पसंतीनुसार पहिल्या सहा क्रमांकांत प्रवेश मिळाल्यास, तेथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेून बाहेर पडेल आणि प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT