पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या घडामोडी घडल्या त्यात नवाब मलिक कुठेही नव्हते. ते आजारी असल्यामुळे सगळ्या गोष्टींपासून लांबच होते. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले तरी जोपर्यंत ते सिद्ध होत नाही, तोपर्यंत ती आरोपी होऊ शकत नाही, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
चाकणकर पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. अधिवेशनात नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे भाजपवर टीका करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना सोबत न घेण्याविषयी सूचित केले. त्यावर बोलताना चाकणकर म्हणाल्या, एका कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहत असतील तर मतांचा प्रवाह वेगवेगळा असतो, आमच्या इथे तीन पक्ष एकत्र आहेत, अनेक गोष्टींमध्ये विचारविनिमय होणे गरजेचे आहे.
फडणवीस यांनी पत्र लिहिल्यानंतर त्यावर अजित पवार यांनी खुलासा केला आहे, त्यामुळे मी यावर अधिक बोलणं उचित ठरणार नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे विरोधकांची भूमिका बजावण्यासाठी कुठलेही काम नसल्यामुळे विरोधकांना विरोधक म्हणून कॅमेर्यासमोर काहीतरी मांडणं गरजेचं आहे, त्यानुसार ते विरोधकांची भूमिका घेऊन त्या पद्धतीने काम करत आहेत. मी महिला आयोगाची अध्यक्षा झाल्यानंतर दिशा सालीयन प्रकरण माझ्याकडे आले होते. त्याचवेळी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, असे आयोगाकडून सांगण्यात आले होते.
हेही वाचा