परिंचे : निरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, निरा देवधर आणि वीर या धरणातून सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू असून, वीर धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या ऐन उन्हाळ्यात शेतीला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नसल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे.
निरा खोऱ्यातील धरणांमध्ये सध्या सरासरी 55.76 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे शेतकरी वर्गाला उन्हाळी पिके घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जीवनदायनी असलेल्या निरा नदीवरील गुंजवणी, भाटघर, निरा देवधर व वीर धरणाचा खूप मोठा आधार राहिलेला आहे. याच धरणातील पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी बाराही महिने तरकारी पिके तसेच फळबागा घेऊन आपली उन्नती साधली आहे.
गुरुवारी (दि. 26) या धरणांमध्ये 55.76 टक्के पाणीसाठा होता. 48 टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर, निरा देवधर, वीर आणि गुंजवणी या चार धरणात सध्या 27.114 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला या चार धरणात 19 टीएमसी म्हणजे 40 टक्के पाणीसाठा होता. परंतु, यावर्षी पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील शेतीला व पिण्याचे पाणी पुरेल इतका समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.
वीर धरणातून निरा डावा कालव्यात 827 क्युसेकने विसर्ग चालू आहे. निरा उजवा कालवा 1 हजार 550 क्यूसेकने सुरू आहे. त्यामुळे नदीकाठचा व कालव्यावर शेती अवलंबून असलेला शेतकऱ्यांची सिंचनाचे अडचण दूर होणार आहे.संभाजी शेडगे, कर्मचारी, धरण प्रशासन
या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे निरा खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना वेळच्या वेळी उसाच्या शेतीला पाणी मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. यावर्षी गहू, हरभरा व इतर कडधान्यांना चांगला उतार आला आहे. या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तरकारी पिकांबरोबर फळबागही हिरव्यागार दिसत आहेत. काढणी झालेल्या शेतात अनेक शेतकऱ्यांनी चारा पिकांचे उत्पादन घेतले आहे. त्यामध्ये कडवळ, मका, घास ही पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्नमार्गी लागलेला आहे.