बारामती : निरा-बारामती हा रस्ता बारामती तालुक्याच्या दृष्टीने सर्वाधिक वर्दळीचा व महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, सध्या या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून वडगाव पोलिस ठाणे ते दहा फाटा यादरम्यान खड्डे पाडले आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे. या मार्गाचे रुंदीकरणाचे काम काही महिन्यांपासून सुरू असले तरी सुरक्षिततेचा पूर्ण अभाव दिसून येत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्यांची संख्या वाढली आहे. विशेषतः पणदरे खिंड परिसरात वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.(Latest Pune News)
पणदरे खिंडीजवळील परिसरात खडी क्रशर व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. या जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्या खचला असून मोठमोठे खड्डे, चिखल व पाणी साचल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल यनिमित्ताने वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. या मार्गावरून दररोज खडी, मुरूम आणि क्रश वाहतूक करणाऱ्या ट्रकांची सततची वर्दळ असते. ही वाहने कोणत्याही नियमांचे पालन न करता धावत असतात.
पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून वाहतुकीचा त्रास वाढला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, दुचाकी वाहनचालकांना तोल जाऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
पणदरे खिंड ते खामगळपाटी यादरम्यान होणारा धुळीचा त्रास, रस्त्यावरील अनियमित गतिरोधक, पार्किंगमुळे अडथळे आणि वाहतूक सूचनाफलकांचा अभाव यामुळे रस्त्यावरील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नव्याने या भागात येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न लागल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी. तसेच, रस्ता खराब होण्यासाठी जबाबदार असलेल्या क्रशर व्यावसायिकांकडूनच दुरुस्तीचे काम करून घेण्यात यावे, अशी मागणीही पुढे आली आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे झाले आहे. त्यामुळे, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.