पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या स्थायी समितीमधून रिक्त होणार्या आठ सदस्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची येत्या सोमवारी खास सभेत निवड होणार आहे. आता या सर्व सदस्यांची पुनर्नेमणूक होणार की 14 दिवसांसाठी नव्या चेहर्यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थायी समितीमधील 8 सदस्यांचा कार्यकाळ येत्या 28 फेब्रुवारीला संपत आहे. त्यात भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 2, तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.
या सदस्यांच्या जागी नव्याने 8 सदस्यांची नेमणूक करावी लागणार आहे. मात्र, महापालिकेचा कार्यकाळ 14 मार्च रोजी संपुष्टात येणार असल्याने या सदस्यांनाच कायम ठेवायचे की नव्याने संधी देऊन नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची, असा पेच प्रशासनापुढे होता. त्यावर प्रशासनाने राज्य शासनाकडून अभिप्राय मागविला होता. शासनाकडून काहीच सूचना न मिळाल्याने प्रशासनाने नवीन आठ सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी येत्या सोमवारी खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या नवीन आठ सदस्यांना केवळ 14 दिवसांचा कालावधी मिळणार असून, समितीच्या केवळ दोनच बैठका होणार आहेत. त्यामुळे नगरसेवकपदाची मुदत संपताना आहे त्या सदस्यांनाच कायम ठेवले जाणार की 14 दिवसांसाठी नवीन सदस्यांना संधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 28 फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्षांचीही मुदत संपत आहे. ही निवड झाल्याशिवाय महापालिकेला पुढील 14 दिवसांसाठी स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक घेता येणार नाही.
भाजप – वर्षा तापकीर, उज्ज्वला जंगले, मानसी देशपांडे, सुनीता गलांडे, राष्ट्रवादी – नंदा लोणकर, अमृता बाबर, काँग्रेस – लता राजगुरू, शिवसेना – बाळासाहेब ओसवाल